Market Committee Election : माघारीसाठी उरले शेवटचे तीन दिवस
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील १४ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळासाठी होत असलेल्या निवडणुकीच्या अर्ज माघार प्रक्रियेसाठी अवघे तीन दिवस उरले असून, अनेक लोकप्रतिनिधींनी आखाडे बांधायला सुरुवात केली आहे. माघारीसाठी मोठी मुदत असल्याने पहिल्या आठ ते दहा दिवसांत अत्यंत नगण्य उमेदवारांनीच आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. शेवटच्या तीन दिवसांत कोण कोण माघार घेतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातील 14 बाजार समित्यांमधील एकूण 252 जागांसाठी विक्रमी 2,421 अर्ज दाखल झाले आहेत. दि.६ एप्रिल रोजी छाननी झाल्यापासून उमेदवारी अर्ज माघारी घेण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, दरम्यानच्या या दहा-अकरा दिवसांच्या कालावधीत अत्यंत अल्प उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता अखेरच्या तीन दिवसांच्या कालावधीत कोण उमेदवार आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतात, कोणाला बसविले जाते व कोणाला चाल दिली जाते, याकडे संपूर्ण सहकार विभागाचे व बाजार समिती क्षेत्रातील मतदारांचे लक्ष वेधले गेले आहे. अखेरच्या या चार दिवसांत माघारीसाठी साम-दाम-दंड-भेद याचा पुरेपूर वापर होणार असल्याने उमेदवारी माघारीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :