पराभवाच्या भितीनेच मुंबई विद्यापीठाची निवडणुक स्थगित : आदित्य ठाकरे
मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भित्रे आहेत. पक्ष फोडून, एक घर फोडून तसेच महाशक्तीसोबत असतानाही कोणत्याही प्रकारची निवडणुक घ्यायला, हे सरकार घाबरत आहे. त्यामुळेच मुंबई विद्यापीठाच्या निवडणुका अचानक स्थगित करण्यात आल्या आहेत. या सिनेटचे दहाजणांकडून हे सरकार काही पडणार नव्हते. तुमचे सरकार आम्हीच पाडणार आहोत, असे आव्हान शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला.
मुंबई विद्यापीठाने अधिसभा अर्थात सिनेट निवडणुक स्थगित केल्याने राजकारण तापले आहे. या पार्श्वभूमीवर मातोश्री येथे आयोजित पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. सध्या केवळ नेमणुका करून कारभार चालविला जात आहे. विद्यापीठात ११ राज्यपाल नियुक्तांची नोंदणी झाली.
प्राध्यापक गटाच्या नेमणुकाही झाल्या. मात्र, निवडणुक स्थगित झाल्याने पदवीधरांचा आवाज विद्यापीठात नसेल. या सिनेट सदस्यांमुळे राज्य सरकार पडणार नव्हते. याचे घटनाबाह्य सरकार तर आम्हीच पाडणार आहोत. पदवीधर मतदार आपल्याला नाकारेल या भितीनेच निवडणुका रद्द करण्यात आल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. या स्थगितीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दबाव होता असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
मागच्या वर्षी विधान परिषदेच्या सहा जागांसाठी पदवीधर, शिक्षक मतदारसंघात भाजप आणि शिंदे गटाचा पराभव झाला. त्याची भिती त्यांच्या मनात बसली आहे. त्यामुळेच आताच्या विद्यापीठाच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्याचा आरोपही ठाकरे यांनी केला.
.हेही वाचा
summer : पुढच्या वर्षी अधिकच कडक उन्हाळा?
Territory : वाघाच्या शोधाचा थरारक प्रवास मांडणारा “टेरिटरी”, ट्रेलर लाँच