Solapur rain: पावसामुळे जिल्ह्यातील ७० हजार हेक्टरवर पिके पाण्यात | पुढारी

Solapur rain: पावसामुळे जिल्ह्यातील ७० हजार हेक्टरवर पिके पाण्यात

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : Solapur rain : गेल्या आठवडाभरात सोलापूर शहर व जिल्ह्यात पडत असलेल्या पावसाने सरासरी ओलांडली आहे. उच्चांकी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे ७० हजार ९०३ हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकाला फटका बसला, तर जवळपास ९७ हजार ६३४ शेतकऱ्याची पिके पाण्यात गेली आहे. (Solapur rain) पावसामुळे ओढे-नाले, नद्या तुडूंब भरून वाहत आहेत. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

उत्तर सोलापूर, मोहोळ आणि बार्शी तालुक्याला सर्वाधिक फटका बसला आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील ४१ गावातील २३ हजार ४७३ शेतकर्‍यांच्या ६ हजार ७७५ हेक्टर, मोहोळ तालुक्यातील १० हजार ५८२ शेतकर्‍यांच्या १२ हजार १०३ हेक्टर, बार्शी तालुक्यातील १३७ गावांतील ५५ हजार ९५४ शेतकर्‍यांच्या ४४ हजार ७६३ हेक्टर पिकांना फटका बसला आहे.

तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील ४७ गावातील ५ हजार ६०१ शेतकर्‍यांच्या ३ हजार ७६१ हेक्टर, अक्कलकोट तालुक्यातील १२ गावांतील ७३० शेतकर्‍यांच्या ५९४ हेक्टर, माढा तालुक्यातील ३७ गावांतील १ हजार २९४ शेतकर्‍यांच्या २ हजार ९०७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला आहे.

यामध्ये काही शेतकऱ्याची पिके वाहून गेली आहे. अनेकांच्या फळबागांचेही नुकसान झाले आहे. काही शेतकर्‍यांचे खरीपातील काढणाला आलेले सोयाबिन, उडीद, मुगाचे नुकसान झाले, तर काहीची तूर, भूईमूग, सूर्यफूल पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे कृषी विभागाच्या पाहणीतून ही आकडेवारी पुढे आली आहे.

३२२ गावांतील ९७ हजार शेतकऱ्यांना फटका

जिल्ह्यातील उत्तर, दक्षिण, अक्कलकेाट, मोहोळ, माढा, बार्शी या सहा तालुक्यातील ३२२ गावांतील ९७ हजार ६३४ शेतकर्‍यांच्या ७० हजार ९०३ हेक्टर शेती पिकाला फटका बसला,

तर यामध्ये करमाळा, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, माळशिरस तालुक्यातील नुकसानीची आकडेवारी निरंक दाखविण्यात आली आहे. ही अंदाजे आकडेवारी असून यामध्ये कमी-अधिक वाढ होऊ शकते, असे कृषी विभागाने सांगितले.

जिरायत, बागायतीसह फळपिकांनाही फटका

जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसात अतिवृष्टी झाली असून यामध्ये जिल्ह्यातील ५१ हजार १९० हेक्टर जिरायत क्षेत्रातील पिकांना, तर १६ हजार १७८ हेक्टर बागायत क्षेत्राला, ३ हजार ५३५ हेक्टर फळ पिकांना याचा फटका बसला आहे.

त्यामुळे शेतकर्‍यांना तत्काळ नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी हालहळ्ळी अ (ता. अक्‍कलकोट) येथील गंगाधर वळदड्डे, गुरुनाथ गोविंदे, गौरीशंकर चौलगे यांच्यासह शेतकर्‍यांनी केली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button