नागरिकांना विश्वासात घेऊनच बारसू येथील रिफायनरी होणार : उदय सामंत | पुढारी

नागरिकांना विश्वासात घेऊनच बारसू येथील रिफायनरी होणार : उदय सामंत

मुंबई, पुढारी वृत्‍तसेवा : रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे तेल रिफायनरी (तेल शुद्धीकरण प्रकल्प) उभारण्यापूर्वी येथील स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प पूर्ण केला जाईल, असा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी  दिला. रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे होणाऱ्या तेल शुद्धीकरण प्रकल्पाबाबत उद्योगमंत्री सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रालयात बैठक घेण्यात आली. यावेळी एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी तेल शुद्धीकरण प्रकल्पासाठी होणारे भूसंपादन, पाणी पुरवठा आदी मुद्द्यांवर सांगोपांग चर्चा करण्यात आली. यावेळी स्थानिक आमदार राजन साळवी यांनी प्रकल्पाला पाठिंबा देत सरकारच्या भूमिकेला समर्थन दिले.

बारसू येथील तेल शुद्धीकरण प्रकल्पासाठी एकूण ६२०० एकर जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. त्यापैकी २९०० एकर जमीन संपादित करण्यात आली असून या प्रकल्पामुळे दोन लाख कोटींची थेट गुंतवणूक होणार आहे. यातून सुमारे एक लाख रोजगार निर्माण होणार आहे.

दरम्यान, या भागातील सत्तर ते ऐंशी टक्के शेतकरी, स्थानिकांनी या प्रकल्पाला पाठिंबा दर्शविला आहे. येथील जनतेच्या मागण्या पूर्ण करण्याचा आमचे सरकार प्रयत्न करेल, या प्रकल्पामुळे येथील शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही. प्रकल्पाबाबत असलेले जनतेचे गैरसमज दूर केले जातील. याशिवाय जमिनीच्या दराबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली जाईल. एकूण पॅकेजची माहिती शेतकऱ्यांना, स्थानिकांना कळविण्यात येईल, असे सामंत यांनी स्पष्ट केले.

रिफायनरी बैठकीतील महत्वपूर्ण निर्णय :

पाण्याची व्यवस्था : प्रकल्पासाठी कोयना धरणातून पाणी आणण्यास आज तत्वतः मान्यता देण्यात आली. या मार्गावरील गावांना नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येईल. या पाण्याचा वापर जिल्ह्यातील इतर भागालाही होईल. १६० एमएलटी पाणी कंपनीला लागणार आहे. राजापूर शहर अर्जुना व खोदवली नदी पात्रातील गाळ काढणे आवश्यक आहे. राजापूर नगरपरिषद, नाम फाऊंडेशन आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने गाळ उपसा करण्यात येणार. या माध्यमातून किमान ५ लाख क्युबिक मीटर गाळ काढला जाईल.

प्रकल्पासोबत या भागात एक अद्ययावत असे सुपर स्पेशालिटी रुग्णालय निर्माण करण्यात येईल. ओणी येथे उपलब्ध असणारे रुग्णालय तत्काळ सुरू करण्यात येईल व येथे लागणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.

मुंबई गोवा महामार्ग रस्त्यालगत सुमारे एक लाख वृक्ष लावण्यात येणार आहेत. आंबा-काजू यांची झाडे लावण्यास प्राधान्य देण्यात येईल.
सोशल मीडिया, प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया यांच्या सहाय्याने व्यापक जनजागृती करून नागरिकांचे प्रकल्पाविषयी असलेले गैरसमज दूर करण्यात येतील, असे यावेळी सामंत यांनी स्पष्ट केले.

या प्रकल्पासाठी शिवणे, देवाचे गोटने या गावांचे भूसंपादन होणार नाही. तर सोलगाव हे गाव कायमचे वगळण्याचा निर्णय घेण्यात आला.
याच भागात आदर्शवत असे कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येईल.

Back to top button