कोणत्याही वॉरंटशिवाय मला ताब्यात घेतले : संजय निरुपम | पुढारी

कोणत्याही वॉरंटशिवाय मला ताब्यात घेतले : संजय निरुपम

पुढारी ऑनलाईन डेस्क ; उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील ठाकरे शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर माजी खासदार संजय निरुपम यांनी किर्तीकर यांच्या राजीनाम्याची मागणी करत बाईक रॅलीचे आयोजन केले होते.
दरम्यान, त्याआधीच निरूपम यांना वर्सोवा येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. यावर संजय निरुपम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खासदार गजानन कीर्तिकर यांच्या निष्क्रियतेबद्दल त्यांच्या पदाचा राजीनामा घेण्यासाठी आम्ही बाईक रॅली काढली. परंतु आमच्या या रॅलीला शिंदे सरकार इतके घाबरले की, कोणत्याही कायदेशीर वॉरंटशिवाय त्यांनी मला वर्सोवा येथून ताब्यात घेतले, असे निरुपम यांनी म्हटले आहे.

दरम्यान, उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघाचे खासदार गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. पक्ष सोडण्याचा निर्णय त्यांचा होता, त्यावर मला काही बोलायचं नाही. त्यांनी का आणि कोणत्या आमिषाला बळी पडून पक्ष सोडला, यातही मला जायचे नाही. शिवसेना – भाजप युतीचे उमेदवार म्हणून तुम्ही निवडणूक लढवली होती. धनुष्यबाण चिन्हावर तुम्ही निवडून आला होता. आता जेव्हा तुम्ही पक्ष सोडला आहे, त्यामुळे तुम्हाला आता संसद सदस्य म्हणूनही राजीनामा द्यायला हवा. ही गद्दारी आहे. ज्या पक्षाने तुम्हाला सगळं काही दिले. ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, मतदारांनी तुम्हाला जास्तीत जास्त मत देऊन निवडून आणले. त्यांच्याशी केलेला विश्वासघात आहे. तुम्हाला जास्त मत मिळाली म्हणून तुम्ही निवडून आला आणि कमी मिळाली, त्यामुळे मी पराभूत झालो. त्यामुळे तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल, अशी मागणी निरुपम यांनी केली आहे.

तुम्ही मुंबईच्या मतदारांचा विश्वासघात केला आहे, त्यामुळे किर्तीकर राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलनाची सुरुवात करत आहोत. बाईक रॅलीपासून या आंदोलनाची सुरुवात होईल. त्यानंतर वेगवेगळ्या स्वरुपात हे आंदोलन होईल. किर्तीकर यांच्यात थोडी तरी नैतिकता शिल्लक असेल, तर त्यांनी हे आंदोलन सुरु करण्यापूर्वी राजीनामा द्यावा. आणि पुण्यामध्ये आरामात उर्वरित आयुष्य घालवावं, अशी आक्रमक भूमिका निरुपम यांनी मांडली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button