फडणवीसांच्या काळात 'महाआयटी'मध्ये २५ हजार कोटींचा घोटाळा : संजय राऊत
पुढारी ऑनलाईन डेस्क
देवेंद्र फडणवीस सरकार काळात महाआयटीमध्ये २५ हजार कोटींचा घोटाळा झाला, असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत केला. देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील महाराष्ट्रात सर्वात मोठा घोटाळा झाला आहे.पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवान यांचा भागीदार हा किरीट सोमय्या यांचा मुलगा आहे. राकेश वाधवान याचा भाजपशी थेट आर्थिक संबंध आहे. किरीट साेमय्या यांनी केलेल्या भष्ट्राचाराचे पुरावे मी ईडीला तीनवेळा दिले आहेत. असा दावाही त्यांनी केला.
मदत केली नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करु, अशी धमकी भाजपच्या नेत्यांनी मला दिली. मराठी भाषेला विरोध करणारे किरीट सोमय्या हे भाजपचे फ्रंटमॅन आहे. ते शिवसेनेच्या नेत्यांवर खोटे आरोप करीत आहेत. गुजरातमध्ये २५ हजार कोटींचा घोटाळा झाला. गेली दोन वर्ष हा घोटाळा सुरु होता तेथे कारवाई का केली नाही, असा सवालही त्यांनी केला.
मी किती कपडे शिवले, याची ईडीने माहिती घेतली
दोन वर्षांपूर्वी भाजप नेत्यांच्या मुलीचे लग्न झाले. त्याला जंगलाचा सेट लावण्यात आला. आम्ही विचार केला घरात कोणाचाही शिरायचे नाही. हे आमच्या मुलांवर आमच्या मुलींच्या लग्नाचा हिशोब विचारतात. ईडी लग्नात केलेल्या खर्चाचा तपास करते, हे ईडीचे काम आहे, असा सवालही त्यांनी केला. माझ्या टेलरकडे ईडीने जावून मी किती कपडे शिवले, याची माहिती घेतली. हे यांचे काम आहे. कुठे जायचे तिथे जा यापुढे शिवसेनेबरोबर तुम्हाला टक्कर द्यावी लागेल, हे लक्षात ठेवा, असा इशाराही त्यांनी दिला.