लोकसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगे- प्रकाश आंबेडकर यांच्यात खलबते | पुढारी

लोकसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगे- प्रकाश आंबेडकर यांच्यात खलबते

वडीगोद्री; पुढारी वृत्तसेवा : वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी (दि.२७) मध्यरात्री मनोज जरांगे यांची भेट घेवून चर्चा केली. अंतरवाली सराटी येथे जवळपास दीड तास त्यांच्यात चर्चा झाली. यावेळी मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा, लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली असल्याची माहिती या दोघांनी पत्रकारांना दिली.

भेट झाली म्हणजे सकारात्मक चर्चा: आंबेडकर

लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. लोकसभा निवडणुकीसह पुढील वाटचाल कशी करायची? यासह इतर विषयांवर चर्चा झाली. संयुक्त निवडणूक लढायची का ? यावर मात्र वेळ येईल त्यावेळी सांगू. आमच्या भेटीत लोकसभा निवडणुकीबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली. परंतु वंचित बहुजन आघाडी आणि मनोज जरांगे पाटील हे एकत्र निवडणूक लढवणार का? या प्रश्नावर उत्तर देताना मात्र आंबेडकर यांनी सावध भूमिका घेतली आहे. योग्य वेळ आली की सांगू, असे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

तर ताकदीने उतरेन : जरांगे पाटील

माझा राजकारणावर विश्वास नाही. निवडणुकीबाबत समाजाने होकार दिला तर मी इतक्या ताकदीने उतरणार की मला आंदोलनात जितके हलक्यात घेतले होते. तसे राजकारणात त्यांना घेता येणार नाही. वंचितकडून प्रस्ताव आला असला तरी सर्व सूत्रे समाजाच्या हाती दिली आहेत. गावागावातील बैठकीचे निर्णय कळतील. ३० तारखेला बैठक आहे. समाजाच्या म्हणण्यानुसार ३० तारखेला सर्व निर्णय घेऊन अपक्ष उमेदवार उभे करण्याबाबत तसेच निवडणुका संदर्भात निर्णय घेवू. माझा जन चळवळीवर विश्वास आहे, असे मराठा आंदोलक, मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, शेतकरी, मजूर, कामगार, महिला, तरुण, बेरोजगार या सर्वांचे प्रश्न सुटत नसतील तर इथे ओरडून चालणार नाही. आपल्याला देणारे बनले पाहिजे. तसाच विषय आरक्षणाचा आहे. आपल्यावर अन्याय होत असेल तर न्यायासाठी आपल्याला राजकारणात जावे लागेल, असेही जरांगे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Back to top button