Manoj Jarange : अंतरवाली सराटीत बैठकीची जय्यत तयारी; जरांगेंच्या भूमिकेकडे लक्ष | पुढारी

Manoj Jarange : अंतरवाली सराटीत बैठकीची जय्यत तयारी; जरांगेंच्या भूमिकेकडे लक्ष

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे २४ मार्चरोजी सकल मराठा समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक होणार आहे. अंतरवाली सराटीत जरांगे यांची ऐतिहासिक विराट सभा झालेल्या ठिकाणी ही बैठक होणार आहे. याची तयारी जोरात सुरू आहे. Manoj Jarange

सगेसोयरे अध्यादेशाला कायदेशीर मान्यता मिळावी, अशी आग्रही मागणी मराठा समाजाकडून केली जात आहे. मात्र, याकडे सरकार दुर्लक्ष करून चालढकलपणा करत आहे. त्यामुळे समाजात सरकारविरोधात रोष असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. या बैठकीत येणाऱ्या लोकसभा निवडणुकी बाबत कोणता निर्णय घेतला जातो का? जरांगे हे सातत्याने राजकीय भूमिका घेणार नसल्याचे सांगत आलेले आहेत. मात्र, बैठकीत कोणता निर्णय घेतला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राजकीय भूमिका घेवून सरकारला कोंडीत पकडण्याची रणनीती आखली जाणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. Manoj Jarange

मराठा समाजाची पुढील  दिशा ठरवण्यासाठी ही निर्णायक बैठक होत आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सरकारने सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी केली नाही, गुन्हे मागे घेतले नाहीत. आचारसंहिता लावून त्यांनी त्यांची दिशा ठरुन डाव खेळला. आता २४ मार्चनंतर मराठा समाज प्रतिडाव टाकून आम्ही हरणार नसल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले आहे.

मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देऊन खुश करण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. मात्र, हे आरक्षण आम्हाला मान्य नाही. सरकारने सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी केली नसल्याने मराठा समाजाला सरकारने फसवले असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळे या बैठकीमध्ये नेमका कोणता निर्णय घेतला जातो, पुढील आंदोलनाची दिशा काय ठरवली जाते, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, या बैठकीत आम्ही आमची पुढची दिशा ठरवणार आहे. समाजावर अन्याय झाला आहे. यापुढे अन्याय सहन केला जाणार नाही. अधिसूचनेचा अवमान झाला आहे. सरकारला पश्चातापाची वेळ आणली नाही, तर नाव बदलून ठेवीन, असा इशारा जरांगे यांनी सरकारला दिला आहे.

Manoj Jarange  भव्य मंडप व भोजनाची व्यवस्था

या भव्य बैठकीच्या नियोजनासाठी २०० फूट लांब तर १०० फूट रुंद असा भव्य मंडप उभारण्यात आलेला आहे. सकल मराठा बांधवांच्या जेवणाची व नाश्त्याची व्यवस्था आयोजकांच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

बैठकीला यांची राहणार उपस्थिती

राज्यभरातील साखळी आणि आमरण उपोषणकर्ते, आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या तरुणांच्या कुटुंबातील सदस्य, वकील, डॉक्टर, मराठा आंदोलक या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा 

Back to top button