नांदेड : तुळजाभवानी जिनिंग प्रकरण; भास्करराव पाटील खतगांवकर यांना जामीन | पुढारी

नांदेड : तुळजाभवानी जिनिंग प्रकरण; भास्करराव पाटील खतगांवकर यांना जामीन

नांदेड: पुढारी वृत्तसेवा : श्री तुळजाभवानी जिनिंग प्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्यात संस्थापक अध्यक्ष माजी खासदार भास्करराव पाटील खतगांवकर व सचिव बी.आर. कदम यांना औरंगाबाद खंडपीठाने अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला. यामुळे दोघांना मोठा दिलासा मिळाला आहे. Bhaskarrao Patil Khatgaonkar

श्री तुळजाभवानी जिनिंग अॅन्ड प्रोसिंग सहकारी संस्थेने नरसी येथील गट क्र. २१७ मधील १४ गुंठे जमीन ९ लाख १० हजारांना विक्री तत्वावर सर्व शासकीय स्तरावरील परवानग्या घेऊन बीएसएनएलला दिली होती. १९९९ मध्ये खरेदीखत करुन देण्याच्या अटीवर हा भूखंड ताब्यात दिला होता. या भूखंडावर बीएसएनएलने टॉवर व टेलिफोन एक्सचेंजची इमारत बांधली होती. पण अद्यापपर्यंत २५ वर्षात एक रुपयाही बीएसएनएलने जिनिंग संस्थेला दिलेला नाही. दरम्यान, ४ फेब्रुवारी २०२२ रोजी बीएसएनएलचे वरिष्ठ अधिकारी व संस्था पदाधिकारी यांच्यामध्ये ९ लाख १० हजार ऐवजी १७ लाख संस्थेस देण्याचा करार झाला होता. तरीही बीएसएनएलने अद्यापही ही रक्कम दिलेली नाही, Bhaskarrao Patil Khatgaonkar

मात्र, पाटील – खतगांवकर यांना अधिकार नसताना संस्थेच्या हिताविरुद्ध खोटा करार केला. त्यामुळे त्यांच्याविरोधात विविध आरोपाखाली दि. २३ ऑगस्ट २०२३ रोजी नायगाव न्यायालयात गुन्हा नोंदवण्याचे आदेश पोलिसांना द्यावेत, अशी मागणी जिनिंगचे विद्यमान चेअरमन श्रावण पा. भिलवंडे यांनी केली होती. त्यानुसार दि.४ जानेवारी २०२४ रोजी रामतीर्थ पोलिसांना गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार पाटील खतगांवकर आणि बी. आर. कदम यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यामुळे खतगावकर यांनी अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी अतिरिक्त जिल्हा न्यायालय बिलोली येथे अर्ज केला होता. मात्र, बिलोली न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज दि. २४ जानेवारी २०२४रोजी फेटाळून लावला होता.

याविरुद्ध खतगांवकर यांनी औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. ज्येष्ठ विधीतज्ञ व्ही.डी. सपकाळ, स्वप्नील एस. राठी यांनी बाजू मांडली. तर औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती नितीन सुर्यवंशी यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

हेही वाचा 

Back to top button