आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, शाळा बंदचा फेरविचार; मुख्यमंत्री निर्णय घेणार | पुढारी

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, शाळा बंदचा फेरविचार; मुख्यमंत्री निर्णय घेणार

जालना ; पुढारी वृत्तसेवा : कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत मुलांचे बाधित होण्याचे प्रमाण कमी आहे. या पार्श्‍वभूमीवर बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत पंधरा दिवसांत आढावा घेण्यात येणार आहे. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी सांगितले. शाळा, कॉलेज बंद असल्याने 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण घरोघरी जाऊन करण्याचा शासनाचा विचार असल्याचे ते म्हणाले.

कोरोना आणि ओमायक्रॉनच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील शाळा पुन्हा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वी घेतला. अनेक जिल्ह्यांत कोरोनाबाधितांचे प्रमाण नगण्य आहेे. त्या ठिकाणी मुलांना कोरोनाचा धोका दिसत नाही. त्यामुळे बंद असणार्‍या शाळा किमान पन्?नास टक्के क्षमतेने तरी सुरू कराव्यात, अशी मागणी शिक्षण क्षेत्रातून पुढे येत आहे.

या पार्श्‍वभूमीवर टोपे यांनी शाळांबाबत शासन फेरविचार करणार असल्याचे नमूद केले. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. राज्यामध्ये 90 टक्के लोकांना पहिला डोस देण्यात आला आहे. 62 टक्के लोकांना दोन डोस दिले आहेत. लसीकरणाच्या मोहिमेला वर्षभरात राज्यात समाधानकारक यश मिळाले, त्याबद्दल आरोग्य कर्मचारी अभिनंदनास पात्र आहेत. आता आपण किशोरावस्थेतील मुलांच्या लसीकरणाकडेही पाहत आहोत.

राज्यात 87 टक्के लोक गृह विलगीकरणात

राज्यात एकूण बाधित संख्या ही जवळपास 2 लाख 65 हजार इतकी आहे. त्यापैकी 86 ते 87 टक्के लोक हे गृह विलगीकरणात आहेत. त्यांना तापासारखी सौम्य लक्षणे आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही, हा लसीकरणाचा परिणाम आहे. लसीकरणाच्या बाबतीत राज्य देशात दुसर्‍या क्रमांकावर आहे. प्रत्येक जिल्ह्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. त्याचप्रमाणे आरोग्य विभागाच्या वतीनेसुद्धा सर्व कर्मचारी पूर्णक्षमतेने, जिद्द, चिकाटी आणि कुठेही हुरूप कमी न होऊ देता काम करत राहतील, असे त्यांनी सांगितले.

शाळा, कॉलेज बंद असल्याने घरोघरी जाऊन लसीकरण करणार : टोपे

15 ते 18 वयोगटातील 42 टक्के लसीकरण पूर्ण केले आहे. सध्या शाळा, कॉलेज बंद असल्याने आता घरोघरी जाऊन लसीकरण करण्याचा विचार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत गंभीर रुग्णांची संख्या कमी आहे. ज्या नागरिकांनी कोरोनाची लस घेतली आहे त्यांना कोरोनाची लागण झाल्यास शक्यतो त्या रुग्णांना ऑक्सिजन देण्याची गरज भासत नाही, असे चित्र आहे.

Back to top button