रत्नागिरी : मासेमारी व्यवसाय डबघाईला | पुढारी

रत्नागिरी : मासेमारी व्यवसाय डबघाईला

रत्नागिरी, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्याच्या समुद्रात गेल्या महिनाभरापासून निर्यात होणारी आणि चांगल्या चवीची पापलेट, सुरमई अशी मासळी मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मासेमारी व्यवसाय डबघाईला आला आहे. नवी मुंबईतील समुद्रात तेलवाहू जहाज बुडाल्याने तेलाचा तवंग वेंगुर्ला विजयदुर्ग समुद्रापर्यंत आला. त्यामुळे दक्षिण समुद्रातून कोकण किनारपट्टीकडे येणारा मासा ऑक्टोबर महिन्यात आलाच नाही. मच्छीमार नौकांना मासळी न मिळण्याचे यंदाच्या हंगामातील हे प्रमुख कारण असल्याचे मच्छीमार नेते जावेद होडेकर यांनी सांगितले.

रत्नागिरी जिल्ह्याला 167 कि.मी. चा समुद्रकिनारा लाभला आहे. मच्छीमारीच्या उद्योगाला उपयुक्त अशी छोटी-मोठी 46 मासळी उतरण्याची केंद्रे किंवा बंदरे आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील किनारपट्टीतील गावांतील कुटुंबांची उपजीविका मासेमारीवर अवलंबून आहे. जिल्ह्यात 3 हजार 961 मासेमारी नौका असून यामध्ये 3 हजार 519 यांत्रिकी नौका, तर 442 बिगर यांत्रिकी नौका मासेमारी करतात.

परंतु, गेल्या महिन्याभरात या मच्छीमार नौकांना मासेमारी नौकासाठी येणार्‍या खर्चाइतकी मासळी मिळत नाही. दक्षिण किनारपट्टीवरील राज्यांमध्ये मात्र मासळीचा बंपर रिपोर्ट असून तेथील मासळीची शीतगृहेही तुडुंब भरली असल्याची माहिती मच्छीमार नेते होडेकर यांनी दिली. तेलाच्या तवंगाला जोड म्हणून हवामानातील बदलही रत्नागिरी जिल्ह्यातील कमी मासळी मिळण्यास कारणीभूत आहे, असेही सांगितले जात आहे. ऑक्टोबर महिन्याच्या प्रारंभी काहिसी जाणवू लागली तेव्हा मासळी मिळण्याचे प्रमाण बर्‍यापैकी होते. त्यानंतर मात्र थंडी गायब झाल्यानंतर मासळी जिल्ह्याच्या समुद्रातून स्थलांतरीत झाली असावी, असाही अंदाज काही मच्छीमारांकडून व्यक्त केला जात आहे.

दक्षिणेतील मच्छीमार नौकांना सापडलेली मासळी इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की ती, जिल्ह्याच्या बाजारपेठेमध्ये येत आहे. त्यामुळे तेथील मच्छीमारांना चांगला नफा मिळत असून जिल्ह्यातील मच्छीमार मात्र अडचणीत आला आहे. केवळ मच्छीच नव्हे तर फिशमील कंपन्यांसाठी लागणारी छोटी मासळीसुद्धा गोवा, कर्नाटक येथून जिल्ह्यातील फिशमील कंपन्यांकडे येत आहे. त्यामुळे या फिशमील कंपन्यांच्या मासळीचा दरही घटला आहे. यातूनही जिल्ह्यातील मच्छीमारांचा तोटाच झाला आहे.

दरवर्षी ऑक्टोबरमध्ये दक्षिणेच्या समुद्रातील मासा कोकण किनारपट्टीकडे स्थलांतरीत होत असतो. त्यामुळे या महिन्यात मच्छीमारांना चांगली मासळी मिळत असते. परंतू तेलवाहू जहाज बुडून त्याचा तवंग सिंधुदुर्ग समुद्रापर्यंत पसरल्याने दक्षिणेकडून येणारा मासा रत्नागिरी जिल्ह्याच्या दिशेने स्थलांतरीत झाला नाही. त्याचबरोबर थंडीही कमी झाल्याने मासळी मिळणे कठीण झाले आहे.

रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्रात दर नसलेली उष्टी बांगडी मिळत आहे. ही मासळी फिशमील कंपन्यांंसाठी उपयोगाची असते. परंतू या मासळीलाही दरवर्षीप्रमाणे दर मिळालेला नाही. दक्षिणेकडील राज्यातून अशी मासळी जिल्ह्यातील फिशमील कंपन्यांकडे मोठ्या प्रमाणात आल्याने दर घसरला असल्याचे सांगण्यात आले. इतकेच नव्हे तर निर्यातीसाठी प्रसिद्ध असलेला बांगडा काही प्रमाणात मिळत असला तरी त्यालाही दर नाही.

याचवेळी दक्षिणेकडील राज्यांमध्ये मात्र, मासळीची शीतगृह तुडूंब भरली गेली आहेत. त्यामुळे येथील मासा मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात येत असून जिल्ह्याच्या समुद्रात मिळणार्‍या मासळीचे दर घसरले आहेत. त्यात पापलेट, सुरमई अशा चविष्ठ मासळीचीही जिल्ह्याच्या समुद्रात वानवा आहे.

जिल्हाधिकार्‍यांनी घेतली दखल

जिल्ह्यातील मच्छीमार नौकांना मासळी मिळत नसल्याची दखल जिल्हाधिकार्‍यांनीही घेतली आहे. जिल्हाधिकारी देवेंदरसिंह हे या संदर्भात मच्छीमार नेत्यांची बैठक घेऊन मासळी मिळत नसलेल्या कारणांबाबतची लवकरच चर्चा करणार असल्याचे मच्छीमार नेते जावेद होडेकर यांनी सांगितले.

Back to top button