नगर : बिबट्याचा मजूर युवकावर जीवघेणा हल्ला | पुढारी

नगर : बिबट्याचा मजूर युवकावर जीवघेणा हल्ला

पारनेर  (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : शेतीच्या कामासाठी आलेल्या युवकावर गुरुवारी रात्री बिबट्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना पारनेर तालुक्यातील पाडळी रांजणगाव शिवारात घडली. या घटनेत संबंधित युवक गंभीर जखमी झाला आहे. पाडळी रांजणगाव येथील बाळासाहेब करंजुले यांच्या शेतात कांदा काढणी व काटणी करण्यासाठी सहा कामगार व एक युवक हे गेली आठ दिवसांपासून रहिवास करत आहेत. गुरुवार 11 रोजी दिवसभर कांदा काढणीचे काम करून सायंकाळी 9 वाजता घराबाहेर पडवीत सर्व जण झोपले असताना रात्री 2 वाजता बिबट्याने पडवीत प्रवेश केला.

दिवसभर काम केल्यानंतर सर्व कामगार गाढ झोपेत असताना कडेला झोपलेल्या आदित्य देवानंद गायकवाड वय- 16 (रा.दिवरंग तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ), या युवकावर बिबट्याने अचानक हल्ला केला. बिबट्याने आदित्य याच्या मानेला धरल्यानंतर तो किंचाळू लागला. आदित्य झोपेत का ओरडतोय या आवाजाने शेजारी झोपलेले त्याचे नातेवाईक जागे झाले. त्यांना आदित्य वर बिबट्या हल्ला करत असल्याचे दिसले. त्यांनी आरडाओरडा करताच बिबट्याने तेथून धूम ठोकली.

दरम्यान आदित्य याच्या मानेला मोठी जखम झाल्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. मालक बाळासाहेब करंजुले यांनी राष्ट्रवादीचे सेवा सोसायटीचे संचालक देविदास रावडे यांना घटनास्थळी बोलावून घेतले. त्यांनी रुग्णवाहिकेच्या सहाय्याने त्याला नगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

जिल्हा रुग्णालयात हेळसांड
जिल्हा रुग्णालयात देखील नेहमी प्रमाणे रुग्णाची हेळसांड सुरू होती. यादरम्यान माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांना संपर्क केल्यानंतर अभिषेक कळमकर त्याठिकाणी येऊन डॉक्टर यांना सूचना केल्यानंतर रुग्णांची दखल घेण्यात आली.

वनविभागाचे अक्षम्य दुर्लक्ष!
सरपंच तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विक्रमसिंह कळमकर यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आदित्यच्या तब्बेतीची विचारपूस केली. यावेळी कळमकर म्हणाले की, गेली अनेक दिवसांपासून पाडळी रांजणगाव,कळमकरवाडी व कडूस परिसरात बिबट्याचे वास्तव आहे. शेतकर्‍यांना काम करताना त्याचे दर्शन होत होते. याबाबत वनविभागाला अनेक वेळा संपर्क साधला पिंजरा लावण्याची विनंती केली. मात्र त्यांनी गांभीर्याने घेतले नाही. नुकताच एका वासरावर बिबट्याने हल्ला केला. आणि आता या युवकावर. असेच हल्ले होत राहिले तर शेतकर्‍यांना कामासाठी बाहेर पडणे अवघड होईल. याबाबत वनविभागाला कळवले असल्याचे कळमकर यांनी सांगितले.

आदित्यची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने आम्ही मिळेल ते काम करतो. आमच्याकडे पाणी कमी असल्यामुळे आम्ही सहकुटुंब सहा ते सात महिने मिळेल, ते काम करतो. रात्री झोपल्यानंतर आदित्यवर जिवघेणा हल्ला झाला. आमची परीस्थिती गरीब असल्याने पुढील खर्चासाठी वनविभागाने मदत करावी
                                  – देवानंद गायकवाड रा. दिवरंग ता. उमरखेड,

अनेक दिवसांपासून परिसरात बिबट्याचा वावर आहे. शेतात गेल्यानंतर त्याचे दर्शन होते. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रात्री झालेला हल्ला हा जिवघेणा होता. यातून वनविभागाने बोध घेणे गरजेचे आहे. यात एखादा व्यक्ती गेल्यावर वनविभागाला जाग येणार का?,वनविभागाने पिंजरा न लावल्यास पारनेर येथील कार्यालयासमोर आंदोलन करणार आहोत.
                                                                    -विक्रमसिंह कळमकर, सरपंच

Back to top button