श्रीरामपूर : पाणी योजनांसाठी गावात जाऊन त्रूटी दूर कराव्यात : पालकमंत्री विखे पा | पुढारी

श्रीरामपूर : पाणी योजनांसाठी गावात जाऊन त्रूटी दूर कराव्यात : पालकमंत्री विखे पा

श्रीरामपूर; पुढारी वृत्तसेवा : जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून 2024 सालापर्यंत प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण आहे. गाव पातळीवर या योजनेची अंमलबजावणी करताना गावात जावून योजनेतील त्रुटी दूर कराव्यात. वेळ पडल्यास पुन्हा सर्वेक्षण करा, मात्र एकाच कंपनीचे पाईप खरेदी करण्याची सक्ती करू नका, अशा सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी केल्या.

शहरातील खा. गोविंदराव आदिक सभागृहात तालुक्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या योजनांच्या कामाचा मंत्री विखे यांनी गावनिहाय आढावा घेतला. यावेळी आ. लहू कानडे, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, जीवन प्राधिकरण अधिकारी, भाजप तालुकाध्यक्ष दीपकराव पठारे, मारूती बिंगले, गणेश राठी, नानासाहेब शिंदे, शरद नवले यांच्यासह विविध गावांचे सरपंच व कार्यकर्ते उपस्थित होते.

योजनांचा आढावा घेतल्यानंतर मंत्री विखे यांनी या योजनेचे काम जागृतपणे करण्याचे अधिकार्‍यांना सूचित केले. अनेक गावांचे ग्रामस्थ, पदाधिकारी व शासकीय यंत्रणेत समन्वयाचा अभाव दिसल्याने योजनेच्या कामात अडथळा निर्माण होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. वेळ पडल्यास योजनेचे सर्वेक्षण पुन्हा करा, परंतु केवळ पाईप टाकण्याची घाई करू नका, अशा सूचना त्यांनी दिल्या.

या योजनेकरीता जिल्ह्यात 4500 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. श्रीरामपूर तालुक्यात या माध्यमातुन 250 कोटींचे कामे बेलापूर, दत्तनगर, निपाणी वाडगाव व खोकर, कडीत मांडवे या गावांमध्ये सुरु आहे. या कामाचा ठेका घेतलेल्या ठेकेदारास ग्रामस्थांना विश्वासात घेऊन काम करण्याबाबत मंत्री विखे यांनी सूचना केल्या.

राजकीय भूमिकांच्या पलिकडे जाऊन लोकांसाठी या योजनेचे काम झाले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करीत मंत्री विखे यांनी, शासनाने या योजनेकरीता दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये 40 कंपन्याचा समावेश आहे, मात्र एकाच कंपनीचे पाईप खरेदी करण्याचा आग्रह धरू नका, अशा स्पष्ट सूचना दिल्या. योजनेस जागा मिळण्याप्रश्नी अधिकार्‍यांनी गावात जाऊन लक्ष घालावे, असे त्यांनी सांगितले. महसूलच्या माध्यमातून महाराजस्व अभियान राबविण्यात येत आहे.

शेत शिवार, पाणंद रस्ते तातडीने मोकळे करण्यासाठी पावसाळ्यापुर्वी तीन महिन्यांमध्ये कार्यवाही करावी. मोजणीचे प्रकरण निकाली काढण्यासाठी जिल्ह्याकरीता स्वतंत्र एजन्सी नेमली आहे. रोव्हर तंत्रज्ञानाच्या साह्याने महिन्यात मोजणी पूर्ण करून नकाशे घरपोहोच देण्यासाठी महसूलने तयारी केली आहे. श्रीरामपूरकरीता 4 मशिन उपलब्ध केल्याचे मंत्री विखे यांनी सांगितले.

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जनतेच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत. वाळू धोरणाची अंमलबजावणी लवकरच सुरू होईल. वाळू लिलाव पूर्णपणे बंद करण्यात आल्याने सरकारच घरपोहोच वाळू देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. काही ग्रामपंचायतींचे सहकार्य मिळत नसल्याच्या तक्रारी अधिकार्‍यांनी केल्या. या तक्रारींंचे निरसन ग्रामस्थांसह ग्रामसेवकांनी लगेच केले. आ. लहू कानडे यांनी मत्त्वपूर्ण सूचना केल्या.

लव्ह-जिहादबाबत हलगर्जी झाल्यास कारवाई..!
सध्या सामाजिक वातावरण बिघडविण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. लव्ह- जिहादबाबत अधिकार्‍यांनी जागृत राहून दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करावी. हलगर्जीपणा झाल्यास तुमच्यावर कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नका, असे मंत्री राधाकृष्ण विखे पा. म्हणाले.

शेती महामंडळ जमीन गोंधळाबाबत चौकशी
शेती महामंडळाच्या जमिनीमध्ये झालेल्या गोंधळाबाबत चौकशी सुरू आहे. अकारी पडित जमिनी शेतकार्‍यांना मिळाव्या, यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी दिले.

Back to top button