कोपरगाव : गोदावरी कालव्यांना पाणी सोडावे
कोपरगाव; पुढारी वृत्तसेवा : गोदावरी कालव्यांचे आवर्तन अजून निश्चित झाले नाही. रब्बीची पिके शेवटच्या पाण्यावर आहेत. विहिरींनी तळ गाठल्याने पिके शेवटची घटका मोजत आहेत. येत्या दोन दिवसांत गोदावरी उजव्या- डाव्या कालव्यांना आवर्तन न सुटल्यास पिके हातातून जातील. लाखोंचा पोशिंदा असलेल्या शेतकर्यावर अशी बिकट परिस्थिती वारंवार येणार असेल तर ही दुर्दैवी बाब आहे, अशी नाराजी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते नितीन औताडे यांनी व्यक्त केली.
तालुक्यात स्थानिक लोकप्रतिनिधींचे याकडे पुर्णतः दुर्लक्ष होत आहे. ते हा विषय गांभीर्याने घेत नाहीत, मात्र आता शेतकरी गप्प बसणार नाहीत. त्यांच्या सहनशीलतेचा अंत संपला. नाशिक पाटबंधारे विभागाने तातडीने गोदावरी कालव्यांना पाणी सोडावे, अशी मागणी औताडे यांनी केली आहे. यंदा धरण पाणलोट क्षेत्रात भरपूर पाणीसाठा उपलब्ध असल्याने गोदावरी डावा- उजवा कालव्याला रब्बी हंगामात दोन तर उन्हाळी हंगामात तीन असे पाच आवर्तन पाटबंधारे विभागाने देणे गरजेचे होते, मात्र रब्बीस केवळ एक तर उन्हाळ्यास तीन आवर्तन त्यांनी जाहीर केले, मात्र ते आवर्तनही वेळेत होत नसल्याने शेतकर्यांना आता पिकांना पाणी देण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
सध्या शेतात रब्बीतील गहू, कांदा, मका आदी पिके उभी आहेत. उन्हाच्या झळा वाढत आहेत. सध्या पिकांना पाणी देणे आवश्यक आहे. पाणी मिळाले नाही तर पिके वाळून शेतकर्यांचे मोठे नुकसान होणार आहे. मागिल आवर्तन सोडल्यानंतर पाटबंधारेने ते केवळ 15 दिवस चालवले. तालुक्यात सार्वजनिक पाणीपुरवठा योजना व गाव तळ्यांनी तळ गाठला आहे. त्यामुळे अगोदर पिण्याच्या पाण्यासाठी पाच- सात दिवस हे तळे भरण्यास जाणार असल्याने पाटबंधारेने दिरंगाई न करता कालव्यांना तातडीने आवर्तन सोडावे.आधीच होरपळलेल्या शेतकर्यांना दिलासा द्यावा, असे असे औताडे म्हणतात.