जामखेडमध्ये राष्ट्रवादीला पुन्हा खिंडार | पुढारी

जामखेडमध्ये राष्ट्रवादीला पुन्हा खिंडार

जामखेड : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात राष्ट्रवादीला पुन्हा खिंडार पडले असून, राजुरी पाठोपाठ गिरवलीमध्येही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.
जामखेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी नाराजी उफाळून आली आहे. याचा पहिला उद्रेक राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या राजुरीत झाला. राजुरीतील 200 कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश करून काही दिवसच होत नाही तोच, आता गिरवली गावात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. येथील राष्ट्रवादीच्या 25 कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा आमदार राम शिंदे यांच्या चोंडी येथील निवासस्थानी पार पडला.

आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत गिरवली येथील गोविंद सुदाम खोसे, अक्षय खोसे,दत्ताभाऊ खोसे,गणेश मुरलीधर खोसे, महेंद्र मनोहर खोसे, किरण दळवी, अभिजीत शिंदे, शुभम खोसे, अभिषेक संजय खोसे, उमेश भाऊ चौधरी, अरुण हनुमंत शेळके, राहुल वाल्हेकर, अनिल शेळके, अभिषेक अंगद खोसे, अनिकेत वाल्लेकर यांनी भाजपात प्रवेश केला. जामखेड तालुक्यातील राष्ट्रवादीचे गावोगावचे कार्यकर्ते पक्षांतराच्या भूमिकेत आले आहेत. हे कार्यकर्ते थेट आमदार राम शिंदे यांच्याशी संपर्क साधून, भाजपात प्रवेश करू लागले आहेत. आगामी 2024 ची विधानसभा निवडणूक, त्या अगोदर होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्था आणि बाजार समिती निवडणुकीच्या दृष्टीने आमदार राम शिंदे यांची राजकीय ताकद वाढणार आहे.

भाजपात सुरू झालेले इनकमिंग राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा ठरू लागली आहे.

निष्ठावंत कार्यकर्ते दुखावले

विधानसभा निवडणुकीनंतर गेल्या अडीच तीन वर्षांत आ. रोहित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बळ न देण्याची घेतलेली भूमिका, हुजरेगिरी, कानफुके, चमकोगिरी, जनाधार नसलेल्या कार्यकर्त्यांच्या आमदार पवारांभोवती वाढलेल्या गराड्यामुळे गावोगावचे निष्ठावंत कार्यकर्ते दुखावले गेले. ज्यांनी आ.पवारांच्या विजयासाठी जिवाचे रान केले, त्यांनाच पवारांच्या यंत्रणेकडून डावलले जात असल्याची भावना गिरवलीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

Back to top button