नगर : नऊ लाख घरांवर फडकणार तिरंगा, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव | पुढारी

नगर : नऊ लाख घरांवर फडकणार तिरंगा, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव

नगर : पुढारी वृत्तसेवा : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत केंद्र शासनाच्या सूचनेनुसार घरोघरी तिरंगा फडकविला जाणार आहे. जिल्ह्यात 8 लाख 99 हजार 666 घरांवर तिरंगा फडकणार आहे. स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात, नायक, क्रांतीकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, देशभक्तीची जाज्वल्य भावना कायम स्वरूपी जनमाणसात रहावी, या उद्देशाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव राज्यभरात राबविण्यात येत आहे.

याचाच एक भाग म्हणून घरोघरी तिरंगा फडकविला जाणार आहे. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद तसेच शासनाच्या विविध विभागांच्या वतीने यासाठी प्रशासकीय पातळीवर नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे.

जिल्ह्यात 8 लाख 99 हजार 666 घरांवर तर नगर महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रात घरांची संख्या 1 लाख 96 हजार 905 असून, तितकेच झेंडे फडकविण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील घरांची संख्या 7 लाख 2 हजार 761 इतकी असून, तितकेच झेंडे फडकविण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हास्तरावर 7 लाख 80 हजार 577 झेंडे उपलब्ध होणार आहेत.

विभागीय आयुक्त कार्यालयाकडून जिल्ह्यासाठी 1 लाख 19 हजार 89 लाख झेंडे पुरविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सांगितले. राष्ट्रध्वजाची उपलब्धता महसूल विभागामार्फत तसेच इतर विभागांमार्फत देखील तालुका, गाव पातळीपर्यंत करण्यासंबंधीच्या सूचना यापूर्वीच देण्यात आलेल्या आहेत. सुनिश्चित केलेल्या दराने राष्ट्रध्वज सर्वांना खरेदीसाठी उपलब्ध असतील. मात्र, भारतीय ध्वज संहितेचे पालन होणे आवश्यक असून, राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये, याची सर्वांनी दक्षता घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

Back to top button