नगर : बेट, मोहनीराज भागात पाणीप्रश्न निकाली | पुढारी

नगर : बेट, मोहनीराज भागात पाणीप्रश्न निकाली

कोळपेवाडी, पुढारी वृत्तसेवा : कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी 5 नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी 131.24 कोटींचा निधी दिला आहे. त्याचाच एक भाग कोपरगाव शहरातील उपनगर असलेल्या बेट व मोहनीराज भागाचा मागील काही वर्षापासूनचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी 2 लाख 10 हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी व पाईपलाईनसाठी 80 लाख रुपये निधी दिला आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासूनचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. बेट व मोहनीराज भागातील नागरिकांसाठी पाण्याची टाकी वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी सेवा दल अध्यक्ष सचिन परदेशी यांनी केले.

चुकीच्या बांधकामाचा बसत होता फटका

बेट व मोहनीराज भागाला पाणी पुरवठा करणारी पाण्याची जुनी टाकी 5 लाख लिटर क्षमतेची आहे. चुकीच्या बांधकाम पद्धतीमुळे साठवण क्षमता असून देखील ही पाण्याची टाकी पूर्ण क्षमतेने भरत नव्हती. त्यामुळे नागरिकांना नियमित पाणी पुरवठा होण्यात अडचणी येत होत्या. यापूर्वी अस्तित्वात असलेलीं पाईपलाईन व्यवस्थित नसल्यामुळे व गुरुत्वाकर्षणाचा अभाव असल्यामुळे जुन्या टाकीला दिवसभर पंपिंग करून पाण्याची टाकी पूर्णक्षमतेने भरत नव्हती व वीजबिलाचा खर्च मोठ्या प्रमाणात होत होता. त्याची दखल घेवून ना. काळे यांनी दिलेल्या निधीतून नवीन पाण्याची टाकी व नवीन पाईपलाईन करण्यात आली आहे.

बेट व मोहनीराज भागातील नागरिकांसाठी 2 लाख 10 हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीसाठी 39 लाख व जलशुद्धीकरण केंद्र ते बेट भागातील पाण्याच्या टाकीला जोडणार्‍या 2340 मीटरच्या 6 इंच पाईपलाईनचा खर्च 40 लाख 30 हजार अशी एकूण 80 लाखाची योजना आहे.

पुढील ३० वर्षांचा अंदाज

बेट व मोहनीराज भागाची सध्याची लोकसंख्या 2971 आहे. पुढील 30 वर्षाच्या लोकसंख्येचा अंदाज घेतल्यास ही लोकसंख्या 3500 होणार आहे. दिवसांतून दोन ते तीन वेळेस पाण्याची टाकी पूर्णक्षमतेने भरल्यास 4 ते 6 लाख लिटर पाणी उपलब्ध होऊन या भागातील नागरिकांना मुबलक पाणी मिळणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. नवीन पाण्याची टाकी केवळ दोन ते तीन वेळेसच ठरावीक कालावधीसाठी पंपिग करावी लागणार असल्यामुळे कोपरगाव नगरपालिकेचा वीजबिलाचा खर्च मोठ असल्यामुळे ही पाण्याची टाकी बेट व मोहनीराज भागातील नागरिकांसाठी वरदान ठरणार असल्याचे परदेशी यांनी म्हटले आहे.

Back to top button