Lok Sabha Election Date 2024: लोकसभा महासंग्राम; महाराष्ट्रात ५ टप्प्यात निवडणुका; २० मे रोजी अंतिम टप्प्यातील मतदान, ४ जूनला निकाल | पुढारी

Lok Sabha Election Date 2024: लोकसभा महासंग्राम; महाराष्ट्रात ५ टप्प्यात निवडणुका; २० मे रोजी अंतिम टप्प्यातील मतदान, ४ जूनला निकाल

पुढारी ऑनलाईन डेस्क: निवडणूक आयुक्तांनी लोकसभा निवडणुक टप्पे आणि तारखांसंदर्भात सदर्भात आज (दि.१६) महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. दरम्यान महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी ५ टप्प्यात मतदान होणार आहे. यामध्ये १९ एप्रिल ते २० मे पर्यंत हे पाच टप्पे पार पडणार आहेत. पाच टप्प्यामध्ये १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे,  १३ मे आणि २० मे रोजी महाराष्ट्रात मतदान प्रक्रिया  राबवली जाणार आहे. तर देशातील सर्व राज्यातील लोकसभा निवडणूक निकाल ४ जूनला जाहीर होणार आहे, असे निवडणूक आयोगाने आज (दि.१६) पत्रकार परिषदेदरम्यान स्पष्ट केले. यावेळी निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणुक आयुक्त राजीव कुमार, निवडणुक आयुक्त सुखबीरसिंह संधू आणि ज्ञानेश कुमार उपस्थित होते. (Lok Sabha Election Date 2024)

महाराष्ट्रात मतदारसंघनिहाय मतदान तारखा पुढील प्रमाणे

◾️पहिला टप्पा – 19 एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
◾️दुसरा टप्पा 26 एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
◾️तिसरा टप्पा 7 मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
◾️चौथा टप्पा 13 मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
◾️पाचवा टप्पा 20 मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ

निवडणूक यंत्रणा सज्ज; बोटाला शाई लावण्यासाठी तयार राहा; आयुक्त

१६ जूनला लोकसभेचा कार्यकाळ संपत असून, जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. संपूर्ण निवडणुक यंत्रणा सज्ज आहे. ९७ कोटी नोंदणीकृत मतदार असून,  १.५ कोटी अधिकारी आणि कर्मचारी लोकसभा निवडणुक प्रक्रिया राबवणार आहेत. यंदाच्या निवडणुकीत १ कोटी ५२ लाख नवमतदार असणार आहेत. यामधील ८५ लाख नवीन महिला मतदार आहेत. भारतात दर हजार पुरूषांमागे ९४८ महिला मतदार आहेत. ४८ हजार तृतीयपंथी मतदान करणार आहेत. १२ राज्यांमध्ये पुरूषांपेक्षा महिलांचे मतदान अधिक आहे. ५५ लाख ईव्हीएम, ४ लाख वाहने या प्रक्रियेत असणार आहेत. त्यामुळे बोटाला शाई लावण्यासाठी सज्ज व्हा; असे आवाहन निवडणुक आयुक्तांनी पत्रकार परिषदेदरम्यान स्पष्ट केले. (Lok Sabha Election Date 2024)

‘या’ राज्यातील विधानसभा पोटनिवडणुका लोकसभेसोबतच

बिहार, गुजतरात, हरियाणा, झारखंड, महाराष्ट्र, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पं.बंगाल, तेलंगणा हिमाचल प्रदेश, राजस्थान, कर्नाटक आणि तमिळनाडू या २६  राज्यातील विधानसभा पोटनिवडणुका पहिला टप्पा लोकसभेसोबतच होणार आहे.  लोकसभा निवडणूक ७ टप्प्यांमध्ये होणार असून पहिला टप्पा १९ एप्रिल, दुसरा टप्पा २६ एप्रिल, तिसरा टप्पा ७ मे, चौथा टप्पा १३ मे, पाचवा टप्पा २० मे, सहावा टप्पा २५ मे आणि सातवा टप्पा १ जूनला होणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी स्पष्ट केले.

Image

हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही

भारतात वय वर्षे १०० वरील २ लाख मतदार असणार आहेत. ८५ वर्षांवरील ८२ लाख मतदार आहेत. त्यामुळे वयोवृद्ध ८५ वर्षांवरील मतदार आणि दिव्यांग मतदारांना घरातूनच मतदान करता येणार आहे. निवडणुक आयोग स्वत: घरात जाऊन मतदान घेणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले. तसेच निवडणुक प्रक्रियेदरम्यान हिंसा रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कंट्रोल रूम उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा हिंसाचार खपवून घेतला जाणार नसल्याचे निवडणुक आयोगाने स्पष्ट केले. तसेच हिंसामुक्त निवडणूक प्रक्रियेसाठी विशेष पावले उचलण्यात आले आहेत. पैशांचे गैरव्यवहार रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जाणार आहे, असेही आयुक्तांनी परिषदेत सांगितले.

सोशल मीडियावरून खोट्या बातम्या, माहिती पसरवल्यास कठोर कारवाई

आजच्या डिजिटल आणि सोशल युगात चुकीच्या माहितीचा सामना करणे अवघड आहे. चुकीची माहिती पसरू नये यासाठी आम्ही काही उपाययोजना केल्या आहेत. आम्ही खोट्या बातम्या दूर करण्यासाठी सक्रिय आहोत. खोट्या बातम्या निर्माण करणाऱ्यांवर सध्याच्या कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. “Verify Before You Amplify” हा खोट्या बातम्यांचा सामना करण्याचा मंत्र आहे. अचूक माहिती प्रचलित आहे याची खात्री करण्यासाठी अधिकृत स्त्रोतांवर अवलंबून राहू या. सामाजिक माध्यमांवरील माहितीपासून सतर्क राहा आणि निवडणूक प्रक्रियेची अखंडता राखण्यात आम्हाला मदत करा, असे आवहान देखील मुख्य निवडणुक आयुक्त राजीव कुमार यांनी केले.

वैयक्तिक हल्ले, असभ्य भाषेपासून लांब राहा; राजकीय पक्षांना आवाहन

निवडणुक प्रचारादरम्यान प्रचार प्रक्रियेसंदर्भात निवडणूक आयोग पूर्ण तयारी करत असून सज्ज आहे. पक्षांना वैयक्तिक हल्ले आणि असभ्य भाषेपासून लांब राहा. प्रचारादरम्यानची सभ्यता राखण्यासाठी परिभाषित भाषेचा वापर करा. आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर टीका करताना भाषेची सीमा ओलांडू नका, असे आवाहन देखील निवडणुक आयोगाकडून राजकीय पक्षांना केले आहे.

हेही वाचा:

Back to top button