नाशिकमध्ये पहिल्यांदाच कार्यशाळा क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाचा सरपंच संवाद | पुढारी

नाशिकमध्ये पहिल्यांदाच कार्यशाळा क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाचा सरपंच संवाद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शासनस्तरावर काम करताना काही मर्यादा असतात. शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत कितपत पोहोचतील, हे माहीत नाही. मात्र ग्रामगाडा चालविणारे पदाधिकारी, सरपंच आणि गावातील उत्साही तरुण यांनी ठरवले, तर गावाच्या कायापालटास विलंब लागणार नाही. सरपंच-ग्रामसेवक खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील मजबूत खांब असतात. त्यांनी एकत्र येऊन काम केल्यास नक्कीच गावाचा विकास लवकर होऊन देश महासत्ता होईल, असा विश्वास भास्करराव पेरे-पाटील यांनी व्यक्त केला. (Quality Council of India, QCI)

ग्रामपंचायतींमध्ये शाश्वत विकासातील उद्दिष्टांचे स्थानिकीकरण या विषयावर क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाचा (Quality Council of India, QCI) सरपंच संवाद हा उपक्रम, क्वॉलिटी सिटी नाशिक अभियान आणि नाशिक जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. ५) आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उपस्थित सरपंच ग्रामसेवकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी झालेल्या कार्यशाळेमध्ये नाशिकमधील 200 हून अधिक सरपंच, ग्रामसेवकांनी सहभाग नोंदवला. गावपातळीवर या विकास उद्दिष्टांची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्यासाठी सरपंचांना सुसज्ज करणे, हा या कार्यशाळेचा उद्देश होता. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, वरिष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी या कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रास ऑनलाइन हजेरी लावली. तसेच विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल, नाशिक महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, नॅबेटचे सीईओ डॉ. वरिंदर कंवर, क्वाॅलिटी कौन्सिल ऑफ इंडियाचे हिमांशू पटेल, कार्यकारी मंडळ सदस्य जितूभाई ठक्कर, महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्सचे माजी अध्यक्ष हेमंत राठी, क्रेडाई नाशिक सिटीचे अध्यक्ष कृणाल पाटील, आशिष कटारिया, विक्रम सारडा, गौरव ठक्कर आदी उपस्थित होते. (Quality Council of India, QCI)

मार्गदर्शन करताना पेरे-पाटील यांनी ग्रामीण भाग हा खऱ्या अर्थाने विकासाचे केंद्रबिंदू आहे, याकडे प्रामाणिकपणे लक्ष दिल्यास लवकरात लवकर याचा विकास होऊ शकतो. ग्रामीण भागाचा विकास झाल्यास देश विकासास विलंब लागणार नाही. शिक्षण, स्वच्छता आणि कौशल्य या आधारावर होत असलेल्या या कार्यशाळेमध्ये हे तीनही निकष देशातील प्रत्येक नागरिकाबाबत कसे महत्त्वाचे आहे, याबाबत त्यांनी माहिती दिली. परिसंवादामध्ये केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, वरिष्ठ मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, सीईओ आशिमा मित्तल यांनीही मार्गदर्शन केले.

नाशिकमध्ये पहिल्यांदाच कार्यशाळा
नाशिकमध्ये पहिल्यांदाच अशी कार्यशाळा क्वाॅलिटी सिटी परिषदेकडून घेण्यात येत आहे. (Quality Council of India, QCI) नाशिक शहरालगतच्या ग्रामपंचायतीमध्ये विकास लवकर होऊ शकेल. कारण महापालिकेची यंत्रणा त्यांना मदत करेल. मात्र सर्वांगीण विकास करण्यासाठी सरपंच आणि ग्रामसेवकांनाच प्रमुख भूमिका बजावावी लागणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Back to top button