शरद पवार गोवारी, मावळचा गोळीबार विसरले का ? बावनकुळेंचा सवाल | पुढारी

शरद पवार गोवारी, मावळचा गोळीबार विसरले का ? बावनकुळेंचा सवाल

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : शरद पवार मुंबईवरचा दहशतवादी हल्लाही विसरले का, असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज ( दि. १ ) केला.  समृद्धी अपघातानंतर उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍यावर विरोधी पक्षांनी टीका केला. यानंतर बावनकुळे यांनी काही सवाल उपस्‍थित केले.

इतके असंवेदशील मुख्यमंत्री महाराष्ट्राने कधीच पाहिले नव्हते

गोवारी हत्याकांड नागपुरात घडले तेव्हा शरद पवार मुख्यमंत्री होते. दीडशे निष्पाप गोवारी बांधव मारले गेले. कित्येक जखमी झाले; पण हे हत्याकांड घडल्यानंतर कुणालाही न भेटता पवार त्याच रात्री मुंबईला गुपचूप पळाले. इतके असंवेदशील मुख्यमंत्री महाराष्ट्राने कधीच पाहिले नव्हते, अशी टीका बावनकुळे यांनी केली.

… तेव्‍हा पवारांना जालीयनवाला बाग हत्याकांड आठवले नाही

मुंबई दहशतवादी हल्ल्यात कोण काय बोलले होते, तेही शरद पवारांनी आठवले पाहिजे. मावळचा गोळीबार झाला तेव्हा याच शरद पवारांना जालीयनवाला बाग हत्याकांड आठवले नाही. पवारसाहेब, या सगळ्या घटनांनी महाराष्ट्राच्या मनावर कायमचे ओरखडे उमटले. डोळ्यात अश्रू आहेत. अजूनही जखमा ओल्या आहेत; मग या घटनांत मृत्यूमुखी पडलेले सगळेच “शरदवासी” म्हटले पाहिजेत का? असा खोचक सवालही बावनकुळे यांनी केला आहे.

हेही वाचा : 

Back to top button