शैक्षणिक धोरणात सर्वांगीण विकासाला प्राधान्य ; शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची माहिती | पुढारी

शैक्षणिक धोरणात सर्वांगीण विकासाला प्राधान्य ; शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची माहिती

पुणे : पुढारी वृत्तसेवा : नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी दिली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात आयोजित निपुण भारत अभियानअंतर्गत मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान व नवीन शैक्षणिक धोरण याविषयी होणार्‍या शिक्षण परिषदेच्या पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

केसरकर म्हणाले, प्राथमिक पातळीवरील विद्यार्थ्यांना मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करण्यासाठी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात विद्यार्थी, पालक, शाळा, शिक्षक व समाज या सर्वांनी पुढाकार घेऊन राज्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या भावी शिक्षणाचा पाया मजबूत करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना नोकरी देणारे शिक्षण मिळावयास हवे. बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे शिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. विकसित देशांत कौशल्य असलेल्या मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्या देशांना आपण मनुष्यबळ पुरवू शकतो. मुंबईत कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येत आहे. त्याच धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येईल.

बहुउद्देशिय शिक्षण मिळावे
लोणावळा येथे होणार्‍या परिषदेत कौशल्य विकासावरील 10 चांगले विषय निवडावेत. विद्यार्थ्यांच्या स्पर्धा आयोजित केल्या पाहिजेत. स्काऊट व गाईड, एनसीसीविषयक अभ्यासक्रमाची विद्यार्थ्यांना गरज आहे. अभिनय, नृत्य, छायाचित्रण, कृषी, व्यावसायिक प्रशिक्षण, सामाजिक कार्य, भाषा इत्यादी विषयात विद्यार्थ्यांनी चमकले पाहिजे. विद्यार्थ्यांना बहुउद्देशीय शिक्षण मिळावयास हवे. त्यादृष्टीने शिक्षण विभागाकडून प्रयत्न केले जावेत, असे केसरकर यांनी सांगितले.

 

Back to top button