Aaditya Thackeray : आगामी निवडणुकीत भगवे वातावरण निर्माण करा : आदित्य ठाकरे | पुढारी

Aaditya Thackeray : आगामी निवडणुकीत भगवे वातावरण निर्माण करा : आदित्य ठाकरे

खेड: पुढारी वृत्तसेवा : देशात पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकीत भगवे वातावरण निर्माण करा, असे आवाहन उद्धव ठाकरे गटाचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे केले. आज (दि.२४) सिंधुदुर्ग व रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या ठाकरे यांनी खेड तालुक्यातील चिंचघर प्रभुवाडी येथे माजी आमदार संजय कदम यांच्या निवासस्थानी बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. Aaditya Thackeray

यावेळी ते म्हणाले की, राज्यात पुढच्या वर्षी निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. त्यासाठी भगवे वातावरण तयार करा. राज्यातील सरकारचे आगामी अधिवेशन हे शेवटचे असून त्यानंतर आपण सत्तेत येणार आहोत. पदवीधर मतदार नोंदणीसाठी अद्याप कालावधी आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकी प्रमाणेच विधान परिषद व राज्यसभेत देखील बहुमत असणे आवश्यक आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपली नोंदणी करून मोठ्या संख्येने मतदान करून आपल्या विचारांच्या प्रतिनिधीला सभागृहात पाठवणे आवश्यक आहे. Aaditya Thackeray

येत्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस जिंकणार आहे. व आपली इंडिया आघाडी सत्तेत जाणार आहे. राज्यातील खोके सरकार निवडणुकीला घाबरते म्हणून ते पहिल्या पासून पळत आहे. सुरत, गुवाहाटी, गोवा आणि महाराष्ट्रात येऊन बिळात लपून बसले आहे. अजूनसुद्धा ते सारखे दिल्ली आणि अहमदाबादला पळत आहेत. तिथून विचारून काम करत आहेत. महाराष्ट्राच्या हक्काचे प्रकल्प गुजरातला नेले जात आहेत. वर्ल्ड कप फायनल पण गुजरातला नेली वानखेडेला असती तर कदाचित जिंकलो असतो. हे सरकार नक्की कोणाचे आहे. महाराष्ट्राचे की गुजरातचे हे कळायला मार्ग नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू झालेले अनेक प्रकल्प आता ठप्प झाले आहेत. कृषी आणि उद्योग क्षेत्रात मरगळ आली आहे. नुकसान होऊन देखील पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळत नाहीत.

पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत जास्तीत जास्त पदवीधर शिवसैनिकांनी आपल्या नावाची नोंदणी करून आपल्या उमेदवाराला विजयी करावे, असे आवाहन यावेळी आदित्य ठाकरे यांनी केले. यावेळी त्यांच्यासोबत खा. विनायक राऊत, माजी खा. अनंत गीते, आ. राजन साळवी, आ.भास्कर जाधव, माजी आ. संजय कदम यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button