बाळासाहेब असते तर, संजय राऊतांना पक्षातून बाहेर काढले असते : दीपक केसरकर
पुढारी ऑनलाईन डेस्क : शिंदे गटातील आमदारांची तुलना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्राण्यांबरोबर केली होती. खासदार संजय राऊत यांच्या टीकेला बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. बाळासाहेब असते तर त्यांनी संजय राऊतांना पक्षातून बाहेर काढले असते, असा टोला दीपक केसरकर यांनी संजय राऊतांना लगावला आहे.
संजय राऊत हे भारतातील सर्वात जहाल प्रवक्ते आहेत, त्यांच्यासारखा प्रवक्ता कोणत्याही पक्षाला मिळू नये. आम्ही संजय राऊत यांच्याबद्दल वारंवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, अशी खंतही दीपक केसरकर यांनी व्यक्त केली. तसेच आत्तापर्यंत आठ मंत्री शिंदे गटात सामील झाले आहेत आणि सध्या ३९ आमदारांचे बळ असल्याचेही दीपक केसरकर यांनी सांगितले.
पवार आणि फडणवीस यांच्या दिल्लीतील हालचालींकडे सर्वांचे लक्ष https://t.co/tw9N2QlinI #pudharinews #PudhariOnline #SharadPawar #DevendraFadnavis #Eknath_Shinde #UddhavThackrey
— Pudhari (@pudharionline) June 26, 2022
संजय राऊत वाटेल ते बोलतात, आम्हाला त्यांनी प्राण्याची उपमा दिली. पण आम्हा आमदारांच्या मतदानाच्या जोरावरचं संजय राऊत राज्यसभेत खासदार म्हणून निवडून गेले, असा टोलाही दीपक केसरकर यांनी लगावला. बाळासाहेब ठाकरे यांनी टपरीवाले, भाजीवाले आमदार केले, पण शिवसैनिकांनी स्वत:वर अनेक गुन्हे दाखल केले होते. शिवसेना अशा शिवसैनिकांच्या जोरावर वाढली. संजय राऊत यांचे पक्षवाढीत काय योगदान काय? असा सवालही दीपक केसरकर यांनी केला.