शिक्षक भरतीचे गौडबंगाल | पुढारी

शिक्षक भरतीचे गौडबंगाल

पश्चिम बंगालमध्ये उद्योगमंत्री पार्थ चटर्जी बहुचर्चित शिक्षक भरती घोटाळ्यामुळे विशेष प्रकाशझोतात आले आहेत. हा घोटाळा सुमारे 20 हजार कोटी रुपयांचा असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पार्थ चटर्जी यांच्या एकेक कहाण्या थक्क करणार्‍या आहेत. त्यांनी आपल्या आवडत्या कुत्र्यांसाठीसुद्धा खास फ्लॅट खरेदी केला होता. आतापर्यंत तपासात उघड झालेला तपशील हे हिमनगाचे टोक म्हणता येईल.

शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातही कोटीच्या कोटी उड्डाणे कशी सहजपणे घेता येतात, त्याचे उदाहरण म्हणजे पश्चिम बंगालमध्ये उघड झालेला शिक्षक भरती घोटाळा. त्याची एकूण व्याप्ती सुमारे 20 हजार कोटी रुपयांची असल्याचा प्राथमिक अंदाज तपास संस्थांनी व्यक्त केला आहे. अर्थात, असे घोटाळे आपल्या देशाला नवे नाहीत. ज्यांच्याकडून उद्याचे आदर्श नागरिक घडवण्याची वगैरे अपेक्षा केली जाते, ते शिक्षकपदसुद्धा कागदावर वजन ठेवल्याखेरीज पदरी पडत नाही, हे आजचे वास्तव आहे. यापूर्वी हरियाणा, मध्य प्रदेश आदी राज्यांमध्ये शिक्षक भरतीत मोठ्या प्रमाणावर लेन-देन झाल्याचे पाहायला मिळाले होते. हरियाणात तर ओमप्रकाश चौताला यांना तुरुंगाची हवा खावी लागली. देशात भ्रष्टाचार हा अंगवळणी पडला आहे. कौतुक असते ते त्याच्या तपशिलात. काही काळ त्यावर रसाळ चर्चा होतात आणि नंतर ते विस्मरणातही जातात.

पश्चिम बंगालमध्ये उद्योगमंत्री पार्थ चटर्जी बहुचर्चित शिक्षक भरती घोटाळ्यामुळे विशेष प्रकाशझोतात आले आहेत. 2014 ते 2021 या काळात हे गृहस्थ त्या राज्याचे शिक्षणमंत्री होते. याच कालावधीत हा घोटाळा घडल्याचे समोर आले आहे. यापूर्वी हिमाचल फ्युचरिस्टीक घोटाळ्यात पंडित सुखराम शर्मा आणि रुणू घोष ही जोडगोळी चांगलीच गाजली होती. त्याच्या आठवणी पार्थ बाबूंनी ताज्या केल्या आहेत. त्यांची खास मैत्रीण अर्पिता मुखर्जी यांच्या घरी जेव्हा ‘ईडी’ने छापेमारी केली, तेव्हा तिथे नोटांच्या राशी ओसंडून वाहत होत्या. आतापर्यंत या विदुषींकडे जवळपास पन्नास कोटी रुपये रोख स्वरूपात मिळाले आहेत. खेरीज पाच किलो सोने आणि अनेक कागदपत्रे ‘ईडी’च्या हाती लागली आहेत. रक्कम मोजण्यासाठी ईडीला नोटा मोजणारी अनेक मशिन्स मागवावी लागली.

जप्त केलेला पैसा ‘ईडी’च्या मुख्यालयात नेण्यासाठी दहा ट्रक मागवावे लागले. आतापर्यंत तपासात उघड झालेला तपशील हे हिमनगाचे टोक म्हणता येईल. खरे सांगायचे तर शिक्षक भरतीतील भ्रष्टाचार आपल्याकडे नवीन नाही. सरकारी पातळीवर सगळा सावळागोंधळ असतो हे खरेच. त्याचबरोबर खासगी शैक्षणिक संस्थांत कशा प्रकारे शिक्षक भरले जातात, हेही सर्वांना माहीत आहे. यातील अनेकजण वर्षानुवर्षे कंत्राटी असतात. त्यांच्या नियुक्तीपत्रातील वेतनाची रक्कम आणि प्रत्यक्ष हाती पडणारी रक्कम यात प्रचंड तफावत असते. त्यात तासिकांच्या पातळीवर नेमले जाणारे म्हणजे साक्षातवेठबिगारीच. थोडक्यात सांगायचे तर शिक्षण क्षेत्रातही भष्टाचाराची पाळेमुळे खोलवर गेल्याचे दिसून येते.

पार्थ चटर्जी यांच्या एकेक कहाण्या थक्क करणार्‍या आहेत. त्यांनी आपल्या आवडत्या कुत्र्यांसाठीसुद्धा खास फ्लॅट खरेदी केला होता, असे तपासात उघड झाले आहे. कोलकात्यातील सिद्धी एन्क्लेव्ह या इमारतीत पार्थ यांचे तीन फ्लॅट असून, त्यातील एका फ्लॅटमध्ये त्यांची तीन आवडती कुत्री वास्तव्य करून आहेत. हा फ्लॅट पूर्णपणे एअर कंडिशन्ड आहे. या कुत्र्यांच्या दिमतीसाठी खास नोकरवर्ग तैनात करण्यात आला होता.

खेरीज अर्पिता मुखर्जी यांच्या नावावर असलेले फ्लॅट वेगळेच! अर्पिता या अभिनेत्री असून त्यांनी बंगाली, उडिया, कानडी आदी चित्रपटांत काही भूमिका साकारल्या आहेत. मात्र, चित्रसृष्टीत त्यांच्या वाट्याला मुख्य भूमिका कधीच आल्या नाहीत. साईड रोलवरच त्यांना समाधान मानावे लागले. पार्थबाबूंच्या संपर्कात आल्यानंतर मात्र त्यांचे नशीब फळफळले. अगदी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत व्यासपीठ भूषवण्याची संधीसुद्धा त्यांना मिळाली.

आता जेव्हा हे सगळे प्रकरण आपल्या पक्षावर आणि मुख्य म्हणजे सरकारवर शेकणार याची जाणीव होऊ लागल्याने ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने पार्थ चटर्जी आणि अर्पिता मुखर्जी यांच्यापासून अंतर राखायला सुरुवात केली. अखेर त्यांची मंत्रीमंडळातून आणि पक्षातून हकालपट्टी केली. वास्तविक, हे आधीच व्हायला पाहिजे होते. कारण, आता केंद्रीय तपास संस्थांवर कसलेही आरोप करण्याची सोय उरलेली नाही. या तपासात सापडलेले घबाड हाच पुरावा पुरेसा बोलका आहे. अन्य प्रकरणांत तृणमूलची नेहमीची ऊरबडवेगिरी खपूनही गेली असती. या प्रकरणात मात्र तसे करता येणार नाही. तृणमूलच्या राजकीय निर्ढावलेपणाचा एक नवा पदर यानिमित्ताने समोर आला आहे, हे खरेच.

प्राचीन गुहेत प्रवेश केल्यानंतर सावध पावले टाकत पुढे पुढे जावे आणि तिथला खजिना पाहून डोळे विस्फारावेत, तशा स्वरूपाचा हा घोटाळा असल्याचे दिसून येते. कारण, आता मोनालिसा दास नावाच्या आणखी एका महिलेचा यातील कथित सहभाग पुढे आला आहे. ‘ईडी’ला मिळालेल्या माहितीनुसार, दास यांच्या नावावर बीरभूम जिल्ह्यातील बोलापूर-शांतिनिकेतन परिसरात मोक्याच्या ठिकाणी किमान दहा मालमत्ता आहेत. त्यांची किंमत कोट्यवधी रुपये आहे.

मोनालिसा यांची नियुक्ती काझी नझरूल विद्यापीठात बंगाली भाषा विभागप्रमुख म्हणून 2013 साली करण्यात आली होती. योगायोगाने त्यावेळी पार्थ चटर्जी हेच राज्याचे शिक्षणमंत्री होते. अचानकपणे या बाईंना एवढ्या मोठ्या पदावर नियुक्त करण्यात आले, तेव्हा त्याचे जोरदार पडसाद माध्यमांत उमटले होते. मात्र, पुढे काहीच झाले नाही. आता त्यांच्या नावावर एवढ्या मालमत्ता कशा? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

एक प्राध्यापक या नात्याने त्यांना मिळणारे मासिक वेतन आणि या टोलेजंग मालमत्तांची किंमत यांचा कुठेच ताळमेळ बसलेला नाही. त्यावर या दासबाईंनी मासलेवाईक उत्तर दिले आहे. त्या म्हणतात, ‘पार्थ हे माझ्यासाठी एखाद्या पालकाहून कमी नाहीत.’ ते काहीही असले, तरी नजीकच्या काळात त्यांनासुद्धा ‘ईडी’च्या चौकशीला सामोरे जावे लागेल यात शंका नाही. आता या ताज्या प्रकरणातही नेहमीप्रमाणे कारवायांच्या बातम्या येत राहतील. शेकडो पानांचे आरोपपत्र दाखल होईल आणि नंतर दुसरे असेच प्रकरण उजेडात येईल. मग काळाच्या ओघात या पहिल्या प्रकरणाच्या पडछाया अंधुक होत जातील.

अंगरक्षकावरही विशेष खैरात

पार्थ चटर्जी यांनी शिक्षणमंत्री म्हणून काम करताना आपल्या अंगरक्षकाचेही कोटकल्याण केल्याचे उजेडात आले आहे. विश्वंभर मंडल असे नाव असलेल्या या अंगरक्षकाच्या तब्बल दहा जणांना सरकारी प्राथमिक शिक्षकपदी स्थानान्न करण्याची किमया चटर्जी यांनी करून दाखवली आहे. कोलकाता उच्च न्यायालयाने याची गंभीर दखल घेऊन या दहा जणांची नियुक्ती कशा प्रकारे करण्यात आली, याबद्दल पश्चिम बंगाल सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

बनावट कंपन्यांद्वारे काळा पैसा पांढरा

पार्थ चटर्जी यांची खास मैत्रीण अर्पिता मुखर्जी यांनी या घोटाळ्यातून मिळालेले कोट्यवधी रुपये पांढरे करण्यासाठी बारा बनवाट कंपन्या स्थापन केल्या होत्या. त्याद्वारे ही कोट्यवधींची रक्कम अधिकृत उत्पन्न म्हणून दाखवली जात होती, असे ‘ईडी’च्या तपासात उघड झाले आहे. त्याखेरीज अर्पिताच्या घरी ब्लॅक डायरी सापडली असून, त्यात यासंबंधीच्या आर्थिक व्यवहारांचा सगळा तपशील नोंदवण्यात आला आहे. ही डायरी म्हणजे या घोटाळ्यातील महत्त्वपूर्ण पुरावा ठरू शकते, असा दावा तपास अधिकार्‍यांनी केला आहे.

काय आहे शिक्षक भरती घोटाळा?

पश्चिम बंगालमध्ये प्रामुख्याने प्राथमिक सरकारी शाळांसाठी ‘क’ आणि ‘ड’ वर्गातील पदे भरण्यासाठी 2014 साली अधिकृतरीत्या जाहिरात प्रसिद्ध झाली होती. प्रत्यक्षात 2016 साली या पदांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, त्यात प्रचंड अनियमितता आढळून आल्याने या प्रक्रियेला कोलकाता येथील न्यायालयात आव्हान देण्यात आले. न्यायालयानेही यात सकृतदर्शनी गोलमाल झाल्याचे निरीक्षण नोंदवले आणि नंतर त्याचा तपास सीबीआय व ‘ईडी’कडे सोपवण्यात आला. परिणामी पार्थ चटर्जी आणि त्यांची मैत्रीण अर्पिता मुखर्जी हे तपासाच्या केंद्रस्थानी आले आहेत. आता या तपासातून अनेक भानगडी बाहेर येत असून, पैसे घेऊन ही हजारो पदे भरली गेल्याचे उघड होत चालले आहे. केवळ ‘ड’ गटातील पदांचीच संख्या 13 हजार आहे. यावरून या घोटाळ्याची व्याप्ती लक्षात येऊ शकते.

सुनील डोळे

Back to top button