साहित्य : बुकर विजेत्या गीतांजली श्री | पुढारी

साहित्य : बुकर विजेत्या गीतांजली श्री

प्रतिष्ठेचे ‘बुकर पारितोषिक’ मिळवणार्‍या गीतांजली श्री या पहिल्या हिंदी भाषिक लेखिका आहेत. त्यांची ‘रेत समाधी’ ही कादंबरी देशातील आणि जगातील हिंदी वाचकांच्या आत्म्याशी जोडलेली आहे. या कादंबरीत स्त्रीच्या मनाची अवस्था अतिशय हृदयस्पर्शी आणि संवेदनशील भाषेत साकारली आहे. यंदाच्या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठी नामांकित 13 कादंबर्‍यांच्या यादीमध्ये भारतीय लेखिका ‘गीतांजली श्री’ यांच्या ‘रेत समाधी’ या हिंदी कादंबरीच्या ‘टॉम्ब ऑफ सँड’ या इंग्रजी भाषांतराचा समावेश करण्यात आला. साहित्यविश्वातील प्रतिष्ठेचा ‘बुकर पुरस्कार’ मिळाल्यानंतर ‘गीतांजली श्री’ यांचे नाव चर्चेत आले.

वडील आयएएस अधिकारी असल्याने, उत्तर प्रदेशातील लहान-मोठ्या शहरांमध्ये त्यांची नियुक्ती होत होती. त्याच शहरांमध्ये गीतांजली श्री लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांनी दिल्लीच्या लेडी श्रीराम कॉलेजमधून पदवी आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून इतिहासात एम.ए. केले. जामिया मिलिया इस्लामिया येथे काही दिवस अध्यापन केल्यानंतर, सुरतच्या सेंटर फॉर सोशल स्टडीजमध्ये पोस्ट-डॉक्टरेट संशोधन केले आणि तेथेच त्यांच्या साहित्यनिर्मितीस सुरुवात झाली. ‘रेत समाधी’च्या पूर्वी त्यांच्या ‘माई’, ‘हमारा शहर उस बरस’, ‘तिरोहित’ आणि ‘खाली जगह’ या चार कादंबर्‍या प्रकाशित झाल्या आहेत. प्रतिष्ठित बुकर पारितोषिक मिळवणार्‍या गीतांजली श्री या पहिल्या हिंदी भाषिक लेखिका आहेत.

हिंदीला जागतिक स्तरावर नवे स्थान मिळवून देण्यात गीतांजली श्री यांचे यश महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास हिंदी साहित्यिकांनी व्यक्त केला आहे. मूळ हिंदी कादंबरीचे ‘रेत समाधी’ या शीर्षकाने डेजी रॉकवेल यांनी भाषांतर केले आहे. डेजी रॉकवेल या युनायटेड स्टेट्समधील चित्रकार आणि लेखिका आहेत. त्यांनी हिंदी आणि उर्दूमध्ये अनेक साहित्यकृतींची भाषांतरे केली आहेत. उत्तर भारताच्या पार्श्वभूमीवर ही कादंबरी बेतलेली आहे आणि एका 80 वर्षांच्या वृद्ध महिलेची ती कथा सांगते. ही महिला पाकिस्तानात जाते आणि फाळणीच्या वेळी झालेल्या त्रासावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करते. कादंबरीत स्त्रीच्या मनाची अवस्था अतिशय हृदयस्पर्शी आणि संवेदनशील भाषेत साकारली आहे. डेजीने आपल्या इंग्रजी भाषांतरातही मूळ भाव जपत सुंदर शब्दांत मांडणी केली आहे. बुकरच्या आधी गीतांजली यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. ‘रेत समाधी’ ही कादंबरी देशातील आणि जगातील हिंदी वाचकांच्या आत्म्याशी जोडलेली आहे.

ही कादंबरी मध्यमवर्गीय कुटुंबातील नातेसंबंध, वाद, भावना, व्यंग, आसक्ती, स्वप्ने-अपेक्षा यांचे चित्रण करते. कुटुंबातील दोन स्त्रिया, एक मुलगी आणि आई; एक मोठी आणि वयाने लहान, एक गंभीर आणि जबाबदार आणि दुसरी मुक्त आणि स्थिर, या कथेचा मुख्य भाग आहेत. त्यांच्या जीवनाभोवती संपूर्ण कादंबरी फिरते. त्यात आई आणि मुलीचे नाते तपशीलवारपणे चित्रित केले आहे. मुलीला सासरी सोडल्यानंतर, तिच्या घरचे पाणीही न पिणार्‍या समाजात आपल्या मुलीसोबत राहणे आईला क्वचितच मिळते. पारंपरिक संस्कृतीनुसार आई आपल्या मुलीसोबत राहणे हे कशा पद्धतीचे असते, याचे गीतांजली यांनी प्रस्तुत कादंबरीमध्ये चित्रण केले आहे. या कथेत जेव्हा आई काही काळ मुलीसोबत राहायला येते, तेव्हा ती पुडीत बंद केलेल्या म्हातार्‍याची मुक्त बाहुली बनते. मुलगी आईच्या वाटेने जगू लागते आणि आई मुलगीच्या. जे संयुक्त कुटुंबात राहतात ते वेगळ्या कुटुंबाशी स्वतःला जोडू पाहतात, याचे भावनिक चित्रण या कादंबरीमध्ये आहे.

या कादंबरीची कथा काय आहे, हे चार ओळीत सांगता येणे शक्य नाही कारण ती ‘कथा’ नाही, असे गीतांजली श्री सांगतात. कादंबरीच्या प्रत्येक पानावर एक नवीन कथा जन्म घेते. यामध्ये प्रत्येक परिच्छेदांमध्ये एक नवीन पात्र प्रवेश करते आणि आपली कथा सांगू लागते. त्यात निर्जीव गोष्टीही जिवंत होतात आणि स्वतःच्या कथा सांगू लागतात. घराचे दार, भिंती, काठी आणि झाडे, पक्षी आणि फुलपाखरे आणि अगदी वाळू आणि वारा. या कादंबरीत मानवी जीवनाशी निगडित विविध संबंधांचे अतूट नाते जोडलेले दिसून येते. नवनवीन कथांचा संगम येथे चित्रित केला आहे. अडीच हजार वर्षांपूर्वी ज्या महामानवांनी एक नवीन जीवनमार्ग सांगितला, त्या तथागत गौतम बुद्धांचे वर्णनदेखील येथे दिसून येते. उत्खननामध्ये सापडलेल्या बुद्धाच्या मूर्तीचे वर्णन करून संशोधनास नवीन वाट सापडते. मानवाने मानवाशी कसे वागावे, हेदेखील बुद्धाच्या तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून सांगण्याच्या प्रयत्न केलेला दिसून येतो. सुजाताची खीर बुद्धाला कशी नवी दिशा दाखवून देते, हे सांगितले आहे. वेगवेगळ्या जीवनमूल्यांचे दर्शन प्रस्तुत कादंबरीमध्ये दिसून येते.

कादंबरीचे नाव ‘रेत समाधी’ का ठेवले, हे वाचताना समजून जाते. पण प्रत्येक व्यक्ती या प्रश्नाचे उत्तर वेगळे देईल, हे नक्की. कादंबरी नात्याच्या जडणघडणीतील अनेक मुद्द्यांचा वेध घेते. स्त्रीकडून असलेल्या समाजाच्या अपेक्षा, तिच्या ठरलेल्या मार्गापासून दूर गेल्याने निर्माण झालेला संघर्ष, पितृसत्ता, पुरुषत्व, स्त्रीवाद, राजकारण, पर्यावरण, जातीयवाद, ट्रान्सजेंडर समस्या, ब्रेन ड्रेन, फाळणी, भारत-पाकिस्तान राजकारण, प्रेम यांबरोबरच एक सामान्य कुटुंब सीमा ओलांडून पाकिस्तानात कसे पोहोचते, याची कथा वाचणे खूपच रोमांचक आहे. ही कादंबरी केवळ भारत-पाकिस्तान सीमाच ओलांडत नाही, तर लेखनाच्या प्रत्येक सीमारेषाही तोडते. वाक्य न बनवताही शब्द इतके कसे चमत्कार करू शकतात, हे या कादंबरीत पाहायला मिळते. कथेतून कवितेकडे आणि कवितेतून गाण्याकडे कादंबरी कधी वळते ते कळत नाही. मात्र, काहीवेळा त्यामुळे थोडा कंटाळाही निर्माण होतो. गोष्टी जबरदस्तीने खेचल्या जात आहेत, असे वाटते. पण पुढची काही पाने नीरसपणे वाचल्यावर कथेला नवे वळण लागते आणि वाचक पुन्हा कथेत रमून जातो. ही कादंबरी वाचत असताना चित्र डोळ्यासमोर उभे राहते. नवीन कथनशैली, प्रतीकात्मक शब्दरचना यांचा प्रत्यय कादंबरीत येतो. साम्राज्यवाद, सामंतवाद, बाजारवादाचे वर्णन करताना मानवी जीवनातील हास्य कसे विलुप्त होत आहे याचे चितंन कादंबरीत आहे. त्याचप्रमाणे घरांमधील बंधुभाव, प्रेम, सुखशांती यामध्ये कसे बदल घडले आहेत यांची चर्चादेखील दिसून येते.

साहित्याचा गंध हा आनंदित करणारा असतो. त्यामध्ये काय आहे आणि काय नाही, याची मीमांसा वाचक करत असतो. कारण की, व्यक्ती तितक्या प्रवृत्तीप्रमाणे एका व्यक्तीचे मत हे सर्वांचे मत असू शकेल, असे नाही. तर मतभिन्नता दिसून येते. या संदर्भात गीतांजली श्री एक उदाहरण देतात की, ‘औपचारिक भोजनामध्ये ज्या प्रकारे प्रत्येक व्यक्तीच्या समोर त्याच्या नावाचे कार्ड ठेवले जाते, त्याप्रमाणे येथे लेखकांची नावे एका ओळीमध्ये लावली आहेत. उदा. भीष्म साहनी, बलवंत सिंह, जोगिंदर पॉल, मंटो, राही मासूम रजा, शानी, इंतजार हुसैन, कृष्णा सोबती, खुशवंत सिंह, रामानंद सागर, मंजूर एहतेशाम आणि राजिंदरसिंह बेदी आदी.’ ही प्रसिद्ध हिंदी व इतर साहित्यिकांची यादी आहे, ज्यांनी भारत-पाकिस्तान फाळणीबद्दल संवेदनशीलतेने अतिशय सुंदर आणि भेदक लेखन केले आहे. लेखिकेने हिंदी कादंबरीच्या प्रचलित मानदंडाच्या सीमारेषा ओलांडत नवीन मांडणी करून एक क्रांती केलेली दिसून येते.

-डॉ. अरुण सोनकांबळे

Back to top button