सतत चिंता, भीती ‍वाटते का? यातून बाहेर पडण्यासाठी ‘या’ ५ गोष्टी नक्की करा | पुढारी

सतत चिंता, भीती ‍वाटते का? यातून बाहेर पडण्यासाठी 'या' ५ गोष्टी नक्की करा

डॉ. संतोष काळे

सध्याच्या धावपळीच्या काळात आणि ताणतणावाच्या जीवनशैलीत अँक्झायटी सतत चिंता वाटणे किंवा भीती वाटणे हा मानसिक आजार सर्व सामान्य बनू लागत असल्याचे दिसू लागले आहे.

काळानुसार चालणे हे गरजेचे असले तरीही त्यामुळे आरोग्याची हेळसांड होणार नाही हे ही बघितले पाहिजे. तीव्र चिंता किंवा सतत वाटणारी भीती यावर औषधे हा सर्वात सोपा उपाय आहे. परंतु, सर्वच डॉक्टर औषधांचा सल्ला देत नाहीत. कारण, औषधी गोळ्या पूर्णपणे रसायने असतात. त्याचा शरीरावर इतर प्रकारे परिणाम होतच असतो. त्यामुळे या समस्येला उत्तम प्रकारे तोंड द्यायचे असल्यास आरोग्यपूर्ण जीवनशैली आणि मनःशक्ती वाढविणे हा सर्वोत्तम उपाय आहे. त्यासाठी आपण काही गोष्टी नक्कीच करू शकतो.

जवळच्या व्यक्तींशी बोला ः कुटुंबातील सदस्य किंवा जवळच्या मित्रांना आपल्या या आजाराबद्दल आवश्य माहिती करून द्यावी. ते आपल्याला नक्कीच मदत करू शकतात. खास करून खूप मानसिक त्रास होत असेल, तर त्या व्यक्तींची सोबत अत्यंत उपयुक्त ठरते. जवळच्या व्यक्तीच्या खांद्यावर डोके ठेऊन त्याच्याकडून चार समजुतीचे किंवा मनाला आधार देणारे शब्द ऐकणे हा अँक्झायटीमध्ये त्वरित आराम देणारा सोपा उपाय आहे. त्यासाठी आपल्याजवळ ज्या व्यक्ती आहेत, त्यांच्याशी बोलणे सुरू करावे. अँक्झायटीची लक्षणे सुरू झाल्यानंतर ताबडतोब अशा व्यक्तींना फोन करून त्यांच्याशी बोलावे. इतर कुठल्यातरी गोष्टींकडे लक्ष वळवावे. अँक्झायटीमध्ये काही वेळेला छातीत दुखणे, किंवा स्नायू आखडणे यासारखी लक्षणे दिसतात. खूप जास्त घाम येणे, बधिरता येणे यासारखीही लक्षणे दिसतात. अशावेळी ताबडतोब जवळच्या व्यक्तीच्या संपर्कात जावे किंवा तिच्याशी बोलावे.

लिहून काढणे ः अँक्झायटीबाबत स्वतःला समजल्यानंतर या लक्षणांचा सामना करण्यासाठी स्वतःहून तयार होणे गरजेचे असते. त्यामुळे त्रास सुरू होणार अशी जाणीव मनात निर्माण होताच ज्या समस्येबाबतचे विचार मनात येत आहेत, ते सर्व बारीक तपशीलासह कागदावर लिहून काढावेत. आठवड्यानंतर पुन्हा त्या नोटस् वाचाव्यात. त्यावेळी आपल्या मनातील तीव्र विचार कमी झाल्याचे जाणवते. कारण लिहिल्यामुळे मनातील खोलवर रुजलेले विचार शब्दाद्वारे बाहेर पडतात आणि त्या विचारांची तीव्रता कमी होते. कुठल्याही प्रकारच्या मानसोपचारातील हा एक चांगला उपचार आहे.

आहारात बदल करा ः एखादे ताजे पेअरचे फळ हे कॅडबरी पेक्षा त्वरित रिलॅक्स करते. त्यामुळे ताण त्वरित कमी होतो. या व्यक्तींनी कॉफी पिणे बंद करावे, असे म्हणले जाते. पण, ती मर्यादित प्रमाणात प्यायला हरकत नाही. तसेच न शिजवलेले काही अन्नपदार्थ खाणेही फायद्याचे ठरते. योगार्ट, ताजे मासे किंवा इतर सी फूड, चिकन, अंडी, पेअर्स, केळी किंवा शेंगदाणे यांच्या सेवणाने ही मोठ्या प्रमाणात प्रोटिन्स आणि कार्बोहायड्रेड मिळतात. जे अँक्झायटी कमी करण्यास उपयुक्त ठरतात. सोडा, फे्रंच फ्राईज, चिप्स, पेस्ट्री आणि सर्व प्रकारचे प्रोसेस्ड हवा बंद अ‍ॅन्नपदार्थ खाणे टाळावे. त्यांना दूरच ठेवणे फायद्याचे ठरते.

श्वसनाचे व्यायाम करावे ः अँक्झायटीचा त्रास सुरू होतो तेव्हा श्वासाचा वेग कमी झालेला जाणवतो. किंवा श्वास कमी कालावधीत घेतला व सोडला जातो. अशावेळी दीर्घ श्वास घेेणे व सोडणे उपयोगाचे ठरते. अर्थात या बाबतची तंत्रशुद्ध माहिती जाणून घेणे आवश्यक असते. सर्व प्रथम खांदे रिलॅक्स करावेत. दीर्घ श्वास घेऊन तो तेवढ्याच संथपणे सोडावा, असे 10-15 मिनिटे केल्यानंतर मनाला आराम मिळतो.

दैनंदिनीपासून थोडे बाजूला व्हा ः दैनंदिन कामाचा एकप्रकारचा ताण मनावर येतो, अशावेळी आपल्या नर्व्हस सिस्टीमला आरामाची गरज असते. त्यासाठी आपल्या दैनंदिनीत काही वेगळ्या नव्या आनंद देणार्‍या गोष्टींचा समावेश करावा. ज्यामधून तुमचे मन व्यस्त तर राहीलच; परंतु त्यामुळे अँक्झायटीशी संबंधित विचारदेखील मनातून निघून जाईल. ध्यान धारणा हा अँक्झायटीवरील उत्तम उपाय आहे.

Back to top button