करूया आरोग्याचा संकल्प ! | पुढारी | पुढारी

करूया आरोग्याचा संकल्प ! | पुढारी

कोरोना विषाणू संक्रमणामुळे 2020 हे वर्ष सर्वांसाठीच ऐतिहासिक ठरले. आरोग्याशी संंबंधित एखादी समस्या उद्भवेल आणि अवघे जग ठप्प होईल, असा विचारही कधी कुणी केला नव्हता. पण, प्रत्यक्षात मात्र तसे घडले. कोरोनासारखे विषाणूजन्य आजार भविष्यातही येत राहतील, असे तज्ज्ञांकडून सांगितले जाते. याखेरीज सद्यस्थितीत अस्तित्वात असणारे आजार आहेतच. नवनवीन आजारांची संकटे येणे आपण थांबवू शकत नाही. पण, त्यांपासून बचाव करण्यासाठी स्वतःला फिट बनवण्याचे काम आपण करू शकतो. नव्या वर्षानिमित्त प्रत्येकाने हाच संकल्प केला आणि वर्षभर त्याच्याशी एकनिष्ठ राहून अंमलबजावणी केली तर नक्कीच राष्ट्रीय परिवर्तन घडेल. 

शरीर तंदुरुस्त आणि आरोग्यपूर्ण असेल तरच सर्व संकल्प तडीस जाऊ शकतात. त्यामुळेच यावर्षी आपणही शारीरिक तंदुरुस्तीकडे लक्ष देण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी मनाशी ठरवा आणि वाटचाल करा, वाटचाल नक्कीच सोपी होईल. 

• जीवनशैलीत बदल झाल्याने आहारातही बदल झालेले दिसून येतात. अनेक जण रेडी टू ईट पदार्थ किंवा इन्स्टंट फूड खाणे पसंत करतात. जंक फूड प्रेमी असाल तर यंदाच्या वर्षीपासून जंक फूड सेवन बंद करण्याचा संकल्प करा, ते शक्य नसल्यास किमान जंक फूड खाण्याचे प्रमाण कमी करण्याचा संकल्प करावा. कारण अशा आहारामुळे आरोग्य चांगले राहण्याऐवजी, पोषण मिळण्याऐवजी आरोग्यासाठी धोका वाढतोय. बाहेरील तयार पदार्थ किंवा झटपट खाता येणार्‍या पदार्थांमध्ये कॅलरीचे प्रमाण अधिक असते. परंतु; पोषक घटकांचे प्रमाण मात्र खूपच कमी असते. त्यामुळे शरीराचे पोषण होण्याऐवजी स्थूलता वाढीस लागते आणि आरोग्य समस्या निर्माण होतात. 

• स्थूलतेमुळे सुमारे 53 विकार जडू शकतात. स्थूलतेमुळे मधुमेह, हायपरटेन्शन, हार्ट फेल्युअर, अस्थमा, कोलेस्ट्रॉल, अतिघाम येणे, सांध्याच्या वेदना, वंध्यत्व आदींचा धोका असतो. कोरोनाचा धोकाही स्थूल, लठ्ठ व्यक्तींना अधिक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या वर्षीच्या संकल्पात वजन जास्त असेल तर ते कमी करण्याचे प्रयत्न करावेत, योग्य वजन असेल तर ते वाढू न देता नियंत्रित ठेवण्याचे प्रयत्नही जरूर केले पाहिजेत. प्रत्येक व्यक्तीने तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. वजन कमी करण्यासाठी योग्य प्रमाणात आहार सेवन करावे, अधिक कॅलरी सेवन टाळावे. ज्या व्यक्ती तंदुरुस्त असतात त्या कमी आजारी पडतात. त्यांची रोगप्रतिकार क्षमता आपोआपच चांगली राहते. 

• प्रत्येक व्यक्तीचा बहुतांश वेळ सध्या लॅपटॉप आणि त्याही पेक्षा जास्त वेळ मोबाईलमध्ये जातो आहे. गॅजेटस्च्या अतिवापराचे दुष्परिणाम यावर अनेक संशोधनेही झालेली आहेत. त्यातून हेच स्पष्ट झाले की ज्या व्यक्ती गॅजेटस्चा अतिवापर करतात त्यांचा आजूबाजूच्या व्यक्तींशी असलेला संपर्क तुटतो. मेंदूतल्या तणावाची पातळी वाढत जाते. त्यामुळे व्यक्ती आक्रमक होते. ज्या व्यक्ती गॅजेटस्वर अधिकाधिक अवलंबून असतात त्यांच्यामध्ये एकाग्रतेची समस्या निर्माण होते. अशा लोकांच्या सामाजिक, भावनिक समस्यांमध्येही वाढ होते.कारण ते घरातच बसून आभासी जगात वावरत असतात. यापासून बचाव करण्यासाठी घराच्या बाहेर पडा, कुटुंब आणि मित्रांबरोबर वेळ घालवा. 

•  व्यायाम आणि योग या दोन्ही शरीर आणि मन स्वस्थ आणि संतुलित राखतात. नियमितपणे व्यायाम केल्यास शरीराची रोगप्रतिकारक क्षमता तंदुरुस्त राहते. व्यायाम हा रोगप्रतिकारक क्षमता चांगली राखण्याचा प्रभावी उपाय आहे. अर्थात वर्कआऊट किंवा व्यायाम म्हटले की जिममध्ये जाऊन घाम गाळणे असेच बहुतेकांना वाटते. पण, केवळ जिममध्ये जाणे म्हणजे व्यायाम किंवा शारीरिक हालचाल असे नाही. तर जो व्यायाम दिवसातून 30 मिनिटे सलग करू शकता, ज्यामध्ये हृदयाची गती वाढते, श्वसनाची गती वाढते तसेच रक्तदाब वाढतो असा कोणताही व्यायाम करावा, पण तो नियमितपणे करावा. व्यक्तीला एकाच प्रकारचा व्यायाम करून कंटाळा येऊ शकतो, मग तो करणे टाळण्याकडे कल असतो. अशा वेळी व्यायामाचे वेगळे प्रकार करून पाहू शकतो. सायकलिंग, एरोबिक्स, स्विमिंग, चालणे आणि योगाभ्यास तसेच विविध नृत्यप्रकारही आपण व्यायाम म्हणून करू शकतो. आवडीनुसार व्यायाम प्रकार निवडा किंवा अधूनमधून नेहमीच्या व्यायामात बदल म्हणूनही करू शकतो. महत्त्वाचे काय की नियमित व्यायाम केलाच पाहिजे. 

पुरेशी झोप – मेंदूचे कार्य नीटपणे चालण्यासाठी तसेच शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी झोपेचे महत्त्व अमान्य करताच येणार नाही. शरीर आणि मेंदू यांचे कार्य योग्य प्रकारे चालण्यासाठी व्यक्तीला 6ते 8 तास झोपेची आवश्यकता असते. पुरेशी झोप मिळावी यासाठी शक्यतो आपल्या झोपेच्या वेळा नियमित कराव्या. झोपण्या-उठण्याची वेळ निश्चित असेल तर शरीराचे जैविक घड्याळ त्यानुसार जुळवून घेते. झोप अपुरी असेल तर रोगप्रतिकारक क्षमता कमजोर होते. त्यामुळे संसर्ग आणि आजारपण यांचा विळखा पडू शकतो. पचनसंस्था ही आरोग्याचा पाया असतो, पण ती नीट चालण्याशी झोपेचा संबंध असतो. झोपणे आणि उठणे याचा आरोग्यावर परिणाम होत असतो. कॅफिनचे सेवन अतिप्रमाणात करू नये. कारण, गाढ आणि शांत झोप लागण्यात अडथळा निर्माण होतो. 

याखेरीज तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा. तणावामुळे आरोग्य खराब होते कारण शरीरातील काही हार्मोन्सचे प्रमाण वाढते. तणावामुळे हृदयाची धडधड वाढते, पचनक्रिया मंदावते. रक्ताभिसरणावरही त्याचा परिणाम होतो. चेता संस्थेची कार्यप्रणालीतही गडबड होते. तसे रोगप्रतिकारक क्षमताही कमी होते, अशा समस्या निर्माण होऊ शकतात. एखादी व्यक्ती सातत्याने तणावग्रस्त राहत असेल तर मधुमेह, केस गळणे, हृदयरोग, स्थूलता, अल्सर तसेच लैंगिक अकार्यक्षमता आदी समस्या भेडसावू शकतात. त्यामुळे तणाव दूर करण्याचा, तणाव दूर ठेवण्याचा शक्य तितका प्रयत्न केला पाहिजे. 

थोडक्यात नव्या वर्षाचे संकल्प केवळ मनात न ठेवता ते प्रत्यक्षात आणण्यासाठी सकारात्मकतेने वाटचाल आवश्यक आहे. मनाची उभारी आणि शारीरिक व्यायाम या सर्वांनी या गोष्टी जरूर साधता येतील. त्यामुळे शरीराचा आणि मनाचाही आवाज ऐका आणि योग्य वेळी प्रतिसाद द्या त्यामुळे आरोग्य निश्चित चांगले राहते. 

Back to top button