नागपूर: शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली; 'मविआ'चे सरकारविरोधात आंदोलन
नागपूर : पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी धान उत्पादक शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली. दुसरीकडे अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांना नुकसानभरपाई म्हणून देण्यात आलेली रक्कम अक्षरश: तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे, अशी टीका करत महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज (दि.१९) विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजीसह आंदोलन केले.
या आंदोलनादरम्यान विरोधकांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दादेखील उपस्थित केला. राज्यातील शेतकऱ्यांवर ओढवलेल्या आसमानी संकटावर सभागृहात चर्चा झाली. त्यावर सोमवारी सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर देत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई जाहीर केली. मात्र, ही नुकसानभरपाई पुरेशी नसल्याची टीका करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
‘महाराष्ट्र शिवछत्रपती -शाहू-फुले-आंबेडकरांचा की दहशतखोरांचा’, ‘इक्बाल मिर्चीसोबत कुणाचे व्यवहार’, कोणता मंत्री ड्रग माफियाचा साथीदार’, ‘महिला असुरक्षित तरुण बेरोजगार, झोपा काढतंय हे ट्रिपल इंजिन सरकार’ असे फलक घेऊन विरोधकांनी हे आंदोलन केले. या आंदोलनात विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अमित देशमुख, प्रणिती शिंदे, सतेज पाटील, रवींद्र वायकर, रवींद्र धंगेकर आदींची उपस्थिती होती.
भाजपची दुटप्पी भूमिका आहे.
भाजप दहशतवादाच्या मुद्द्यावर दुटप्पी भूमिका घेत आहे. आम्ही पुरावे देऊनही त्याची दखल घेत नाही. मात्र, त्यांच्या आमदारांनी माहिती देताच ते एसआयटी चौकशी लावतात. या भूमिकेच्या विरोधात आम्ही हे आंदोलन केल्याचे यावेळी अंबादास दानवे म्हणाले.
हेही वाचा
- Swabhimani Shetkari Sanghatana : ‘स्वाभिमानी’चा मोर्चा रोखला; रविकांत तुपकर पोलिसांच्या ताब्यात
- Winter Session Nagpur : धान उत्पादकांना हेक्टरी २० हजार बोनस : मुख्यमंत्र्यांची घोषणा
- Winter Session Nagpur : गिरीश महाजनांचे सलीम कुत्तासोबत संबंध: एकनाथ खडसेंच्या आरोपाने खळबळ