Sindhudurg News: कुडाळ येथे कंत्राटी कर्मचार्यांच्या प्रश्नावरून महावितरणचे अधिकारी, ठेकेदार धारेवर
कुडाळ : पुढारी वृत्तसेवा : मागील दीड वर्षात विजेच्या धक्क्याने जिल्ह्यात सात कंत्राटी कर्मचारी मृत्युमूखी पडली आहेत. हे कर्मचारी प्रामाणिकपणे महावितरणचे काम करतात. त्यामुळे आता यापुढे तुम्ही निविदेतील अटी, शर्तीनुसार काम करा. आम्ही निविदेच्या आड येणार नाही. कंत्राटी कर्मचाऱ्यांवर यापुढे अन्याय झाल्यास तुम्हाला आम्ही सोडणार नाही, प्रसंगी आम्हाला अटक झाली तरी चालले, असा इशारा माजी सभापती जयेंद्र रावराणे यांनी महावितरणच्या कंत्राटी कामगार पुरविणार्या ठेकेदार कंपनीच्या प्रमुखाला दिला. Sindhudurg News
यावेळी अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनाही रावराणे यांनी धारेवर धरत या ठेकेदारावर वचक ठेवण्याची जबाबदारी तुमचीही आहे, ती जबाबदारी तुम्ही नाकारू शकत नाही, असे सुनावले. अखेर अधीक्षक अभियंत्यांच्या समोर यापुढे निविदेतील अटी, शर्ती नुसार आपण सिंधुदुर्गात काम करू, कोणत्याही कंत्राटी कर्मचार्यांवर आपल्याकडून अन्याय होणार नाही, अशी ग्वाही ठेकेदाराने दिली. Sindhudurg News
सिंधुदुर्गात गेल्या दीड वर्षात महावितरण मध्ये कंत्राटी कामावर वायरमन म्हणून असलेल्या तीन मुलांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. याप्रश्नी सिंधुदुर्ग जिल्हा कंत्राटी कर्मचारी कामगार संघटनेच्या वतीने महावितरणच्या अधिकार्यांची भेट घेवून अशोक सावंत यांनी वारंवार लक्ष वेधले. इतर पक्षाच्या शिष्टमंडळांनीही महावितरणचे लक्ष वेधले होते, मात्र याप्रश्नी अपेक्षित कार्यवाही झाली नव्हती. अखेर माजी सभापती जयेंद्र रावराणे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिवाळीपूर्वी अधीक्षक अभियंत्यांची भेट घेवून चर्चा केली होती. त्या चर्चेत अधीक्षक अभियंता, अहमदनगर येथील ठेकेदार, माजी सभापती जयेंद्र रावराणे व अशोक सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्याचे ठरले होते. त्यानुसार सोमवारी महावितरण कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात ही बैठक संपन्न झाली.
यावेळी माजी सभापती जयेंद्र रावराणे,अशोक सावंत, अशोक तोडणकर, शेखर गावकर, कंत्राटी कामगार ठेकेदार, अजय गावडे, संदिप बांदेकर आदी उपस्थित होते.
यावेळी रावराणे यांनी जिल्ह्यात झालेल्या अपघाताची जंत्रीच वाजली. तसेच कंत्राटी वायरमन यांना सुरक्षिततेसाठी ठेकेदाराकडून कोणतेही साहित्य दिले जात नाही, त्यांना ओळखपत्र नाही, विमा कार्ड नाही, ड्रेस नाही हे सर्व पुरविण्याची जबाबदारी कुणाची? असा सवाल उपस्थित करत तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगले सहकार्य हवे असेल, तर नियमात राहून काम करा. आमची पोर ही जिल्ह्याची मालमत्ता आहे, ती कायद्याने वापरायची आहे, हे लक्षात ठेवा, अन्यथा गाठ आमच्याशी आहे, असा सज्जड दम ठेकेदाराला दिला.
Sindhudurg News वर्षभरानंतर कै. तनयच्या वडिलांकडे 20 हजाराची मदत
महावितरणचे कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले तनय सावंत यांचा वर्षभरापूर्वी विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. तनयच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना मदत मिळावी, यासाठी काही पैसे जमा केले होते. ते पैसे तनयच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचलेच नाहीत, असे अशोक सावंत यांनी यावेळी अधीक्षक अभियंता पाटील यांच्या समोर सांगितले. तसेच काही जणांकडे जमा असलेली २० हजार रूपयांची रक्कम यावेळी पाटील व माजी सभापती जयेंद्र रावराणे यांच्या हस्ते तनय सावंत याच्या वडिलांकडे सुपूर्त केली.
हेही वाचा