हवाई प्रवास ही उच्चभ्रू लोकांची मक्तेदारी राहिलेली नाही, केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांचे प्रतिपादन | पुढारी

हवाई प्रवास ही उच्चभ्रू लोकांची मक्तेदारी राहिलेली नाही, केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : भारतात हवाई प्रवास ही आता केवळ उच्चभ्रू लोकांची मक्तेदारी राहिलेली नाही, असे मत केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केले.

एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेला ७५ वर्षे पूर्ण झाली. या निमीत्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. उडान योजना, विमानतळांची संख्या दुप्पट करणे, परवडणारे विमान भाडे अशा उपक्रमांच्या माध्यमातून विमान प्रवास सर्वसामान्य माणसासाठीही प्रवासाचे साधन बनवण्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाते, असेही डॉ जितेंद्र सिंह यावेळी बोलताना म्हणाले.

अंतराळ क्षेत्राबाबत बोलताना डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हणाले की, २०२५ साली भारताच्या पहिल्या संपूर्ण स्वदेशी गगनयान मोहीमेनंतर, २०३० साली भारतीय व्यक्ती चंद्रावर उतरेल आणि २०३५ पर्यंत भारताचे स्वतःचे अंतराळ केंद्र असेल.

पुढे बोलताना ते म्हणाले की, भारत एरोस्पेस तंत्रज्ञानात आणखी उंच शिखरे गाठण्यासाठी तयार आहे,  सरकार वैज्ञानिक समुदायाला निरंतर पाठिंबा देत आहे. तसेच आपल्या पुढील वाटचालीसाठी आवश्यक स्रोत आणि पायाभूत सुविधाही सरकारच्या वतीने उपलब्ध करून दिल्या जात आहेत, ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाने आपल्या एरोस्पेस परिक्षेत्रात बदल घडवण्यास तसेच स्वदेशी उत्पादने वाढवण्यास सुरुवात केली आहे, असेही डॉ. जितेंद्र सिंग म्हणाले.

भारतीय एरोस्पेस क्षेत्राचा लक्षणीयरीत्या विकसित झाला आहे. यशस्वी चांद्रयान-3, मंगळयान मिशन, आदित्य एल१ आणि इस्रोची गगनयान मोहीम, स्वदेशात विकसित हलके लढाऊ विमान तेजस, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेद्वारे विकसित अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली, सार्वजनिक क्षेत्रातील इतर संबंधित तंत्रज्ञान, खाजगी उद्योग आणि स्टार्टअप्स तसेच आपले शास्त्रज्ञ आणि अभियंते यांनी जागतिक स्तरावर भारताचे सामर्थ्य दाखवून दिले आहे, असेही डॉ. सिंह जितेंद्र यांनी विशेषत्वाने नमूद केले.

Back to top button