पाच वर्षांत अडीच लाख नोकर्‍या; भाजपचा राजस्थानसाठी जाहीरनामा घोषित | पुढारी

पाच वर्षांत अडीच लाख नोकर्‍या; भाजपचा राजस्थानसाठी जाहीरनामा घोषित

जयपूर ः वृत्तसंस्था राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी 25 नोव्हेंबर रोजी मतदान होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी भाजपचा 75 पानांचा जाहीरनामा जाहीर केला. गहू 2700 रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करण्यात येईल, ‘किसान सन्मान निधी’ अंतर्गत शेतकर्‍यांना वर्षाला 12 हजार रुपये देणार असल्याचेही यामध्ये म्हटले आहे.

जाहीरनाम्यात म्हटले आहे की, यासोबतच ज्या शेतकर्‍यांच्या जमिनी जप्त करण्यात आल्या आहेत, त्यांना मोबदला देण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक शहरात अँटी रोमिओ फोर्स तयार करण्यात येणार असून, प्रत्येक पोलिस ठाण्यात महिला डेस्क बनवण्यात येणार आहे. बारावी परीक्षेत गुणवत्ता यादीत येणार्‍या विद्यार्थिनींना मोफत स्कुटी दिली जाणार आहे. पोलिस दलात महिलांना 33 टक्के आरक्षण दिले जाईल. यासोबतच पाच वर्षांत अडीच लाख लोकांना सरकारी नोकर्‍या उपलब्ध करणार असल्याचेही भाजपने यामध्ये म्हटले आहे.

यामध्ये प्रत्येक नवजात मुलीला 2 लाख रुपयांचा बचत बाँड दिला जाणार आहे. यामध्ये मुलगी सहावीला असताना खात्यात 6 हजार रुपये, नववीत 8 हजार रुपये, दहावीच्या वर्गात 10 हजार रुपये, बारावीच्या वर्गासाठी 14 हजार रुपये, व्यावसायिक अभ्यासासाठी 50 हजार रुपये आणि 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतर खात्यात एक लाख रुपये जमा होतील. मध्य प्रदेशच्या लाडली लक्ष्मी योजनेच्या धर्तीवर ही योजना सुरू करण्यात येणार आहे.

जाहीरनामा प्रसारितकेल्यानंतर नड्डा म्हणाले की, राजस्थानमध्ये पेपरफुटीच्या नोंदी झाल्या आहेत. वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेतही 450 कोटींचा घोटाळा झाला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या कुटुंबीयांना 11 हजार कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले आहे, यावरून काँग्रेस घराणेशाही आणि भ्रष्टाचार कसा वाढवते हे दिसून येते, असा आरोप त्यांनी केला.

गेहलोत सरकारच्या घोटाळ्याच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करणार

सरकार सत्तेवर आल्यास गेहलोत सरकारमधील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात येईल, असे आश्वासन भाजपने दिले आहे. याअंतर्गत पेपरफुटी, जल जीवन मिशन, वृद्धापकाळ निवृत्ती वेतन घोटाळा यासह सर्व घोटाळ्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल. विशेष म्हणजे निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थानमधील घोटाळ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन देत आहेत.

Back to top button