धुळे : पिंपळनेर येथे कॉंग्रेसची जनसंवाद सद्भावना यात्रा
पिंपळनेर:(ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा
राज्यातील शेतकरी अडचणीत आहे. गारपीट, पीक विम्याची रकम त्यांना मिळाली नाही. पण त्यांच्या वेदना बघायला सरकारकडे वेळ नसल्याचा आरोप आ. कुणाल पाटील यांनी येथे बोलताना केला. विकासाच्या नावाखाली कोट्यवधीच्या निविदा काढल्या जात आहेत. हा पैसा जातो कुठे, असा प्रश्नही उपस्थित करीत जनता आता या सरकारला कंटाळली असल्याने येणारे सरकार हे महाविकास आघाडीचेच असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
खा. राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्यावतीने राज्यात विविध ठिकाणी संवाद यात्रा काढण्यात येत आहे. पिंपळनेर शहरातही आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वात यात्रा काढण्यात आली. कुडाशी येथे गणपती मंदिरापासून सुरू होऊन रॅलीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. पिंपळनेर शहरात दाखल होताच माजी खा.बापूसाहेब चौरे यांच्या निवासस्थानी फटाक्यांची आतषबाजी करत आदिवासी पारंपरिक नृत्य तसेच वाद्य वाजवत पिंपळनेर शहरातून जनसंवाद रॅली भर पावसात मार्गक्रमण होऊन पिंपळनेर सटाणा रस्त्यावरून कुणाल पाटील यांनी सर्व सामान्य जनतेसोबत ठिकठिकाणी संवाद साधला. शहरातील साईकृष्णा रिसॉर्ट मध्ये पोहचून सभेला मार्गदर्शन करुन आ.पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना त्यांनी भारत जोडो यात्रेचा उद्देश मानवतेचा, माणसाला माणासाशी जोडण्याचा होता. तोच संदेश घेऊन आम्ही राज्यात निघालो असल्याचे ते म्हणाले. जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांनी संवाद यात्रेत सांगितले की, साक्री तालुक्याच्या आमदार मंजुळा गावित यांनी विधानसभेत सांगितले की, साक्री तालुक्यात दुष्काळ नाही त्यांनी शेतकऱ्यांचा आवाज उठवायला हवा होता. पण तसे केले नाही. भाजपने हूकूमशाही सुरू केली आहे. परंतू काँग्रेसचा विचार संपू शकणार नाही असे सनेर म्हणाले.
प्रास्ताविक सादर करताना मा.खा.बापूसाहेब चौरे म्हणाले की, काँग्रेसने या जनसंवाद रॅलीतून तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत संपर्क होऊन जनमानसातील अडीअडचणी त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ही यात्रा काढली आहे. पानखेडा येथे जनसंवाद रॅलीतून मा.आ.डी.एस.अहिरे यांनी केंद्र व राज्य सरकार मुख्य विषयांकडे लक्ष न देता नको ते विषय काढून जनतेचे लक्ष विचलीत करतात. शेतकऱ्यांकडे हे सरकार कधी लक्ष देईल असा सवाल केला. त्यानंतर कुडाशी पासून 13 किलोमीटर चालत ही यात्रा पिंपळनेर पोहचून साकीकडे मार्गस्थ झाली.
या जनसंवाद रॅलीत आमदार कुणाल पाटील, माजी खासदार बापूसाहेब चौरे, जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष शामकांत सनेर, मा. आ.डी.एस.अहिरे, मा.आ. वसंत सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण चौरे, जि.प सदस्य धिरज अहिरे, इंजि. अशोक सोनवणे, विश्वास बागुल, तालुका अध्यक्ष भानुदास गांगुर्डे, सरचिटणीस गणेश गावीत, जिल्हा युवक अध्यक्ष गणेश गर्दै, सभापती शांताराम कुवर, सत्यशोधक संघटनेचे डोंगर बागुल, संदीप भोये, उत्तमराव देसले, शहराध्यक्ष पांडुरंग सूर्यवंशी, मा.पं.स.सदश्य पी.एस.पाटील, रमेश गांगुर्डे, आनंदा सूर्यवंशी, डॉ.दत्ता परदेशी, गणपत चौरे, विजय बागुल, उत्तम देशमुख, अनिल गायकवाड, प्रेमचंद सोनवणे, रवींद्र मालुसरे, संजय बच्छाव, शुभम पाटील, दिव्येश गांगुर्डे, कपिल पाटील यांच्यासह तालुक्यातून हजारो कार्यकर्त या संवाद यात्रेत सहभागी झाले होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भानुदास गांगुर्डे यांनी तर आभार प्रवीण चौरे यांनी मानले.
हेही वाचा :