Sulkood Water Supply Scheme : इचलकरंजीला इतर पर्याय असताना दूधगंगेतूनच पाण्याचा अट्टाहास का ?: बबनराव चौगुले | पुढारी

Sulkood Water Supply Scheme : इचलकरंजीला इतर पर्याय असताना दूधगंगेतूनच पाण्याचा अट्टाहास का ?: बबनराव चौगुले

दत्तवाड : पुढारी वृत्तसेवा : इचलकरंजीला वारणा, पंचगंगा, कृष्णा असे भक्कम पर्याय उपलब्ध असताना दूधगंगेतून पाण्याचा अट्टाहास का ? असे मत गुरुदत्त शुगरचे संचालक बबनराव चौगुले यांनी व्यक्त केले. ते इचलकरंजीला पाणी देण्याच्या समर्थनात उतरलेल्या आजी-माजी खासदार व नेत्यांचा दत्तवाड येथे जाहीर निषेध करण्यात आला. त्याप्रसंगी बोलत होते. (Sulkood Water Supply Scheme)

चौगुले पुढे म्हणाले की, काळम्मावाडी धरण उभारणीप्रसंगी तयार केलेल्या आराखड्यात गैबी बोगदा, थेट पाईपलाईन, नदी काठावरील गावे सोडून इतर गावांच्या पाईपलाईन आदींचा समावेश नव्हता. त्यामुळे मुळातच धरणात पाणी शिल्लक राहत नाही. तेव्हा इचलकरंजीला पाणी देण्याचा प्रश्नच उरत नाही. तसेच पाण्यावर कोणालाही जसे हक्क सांगता येत नाही, तसे इतरांचा पाण्याचा हक्कही हिरावून घेण्याचा कुणाला अधिकार नाही. तसेच सुळकूड (Sulkood Water Supply Scheme) नंतरच्या शिरोळ तालुक्यातील पाच गावातील शेतीचे शिष्टमंडळाने क्षेत्र ३०० हेक्टर सांगितले आहे. मात्र, प्रत्यक्षात ते १० हजार ८०० एकर आहे. व कर्नाटकातील जवळपास 30 हजार एकर आहे. नदीतच पाणी नाही राहिले, तर कॅनलमधून या पाच गावांना पाणी देणार कुठून ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

याप्रसंगी भाजप तालुका उपाध्यक्ष राजगोंडा पाटील म्हणाले की, इचलकरंजीकरांच्या म्हणण्यानुसार धरणात अतिरिक्त साठा आहे. तर मग दूधगंगा नदी काठावरील शेकडो एकर शेती वाळली कशी ? तसेच यंदा अनेक गावांना टँकरने पाणी देण्याची वेळ आली. तर दत्तवाडमध्ये चक्क जूनमध्ये पाण्याची गरज भागवण्यासाठी नदीपत्रात बोर मारण्याची वेळ आली. त्यामुळे इचलकरंजीला पाणी दिल्यानंतर काय परिस्थिती होईल.

सरपंच चंद्रकांत कांबळे म्हणाले की, इचलकरंजीच्या शिष्टमंडळाने आपल्याला दूधगंगेतून पाणी मिळावे, यासाठी धरणातील पाणीसाठ्याची केलेली जाहिरातबाजी ही वस्तुस्थितीला सोडून व अपुरी आहे. या योजनेमुळे दूधगंगा नदी काठाला दीर्घकालीन विपरीत परिणाम भोगावे लागणार आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आम्ही योजना कार्यान्वित होऊ देणार नाही, असा निर्धार व्यक्त केला.

ग्रामपंचायत सदस्य संजय पाटील म्हणाले की, इचलकरंजीच्या शिष्टमंडळाने सुळकूडपर्यंतच्या गावांचा विचार केला आहे. मात्र, त्यानंतर शिरोळ तालुक्यातील पाच गावांचे काय होणार याचा विचार नाही. तसेच या गावांना कॅनॉलद्वारे अथवा पाईपलाईनने पाणी देणे, हा पूर्णपणे बालिशपणा आहे. तसेच इचलकरंजी पाकिस्तानात आहे का ? असे म्हणणारे खासदार माने यांनी मग ही दूधगंगा नदी काठावरील पाच गावे अफगाणिस्तानात आहेत का ? याचा विचार करावा.

याप्रसंगी तंटामुक्त अध्यक्ष सुरेश पाटील, पोलीस पाटील संजय पाटील, डी. एन. सिदनाळे, नूर काले, एन. एस. पाटील, बाबुराव पवार, युवराज घोरपडे, प्रकाश चौगुले, बंडू चौगुले, लाला मांजरेकर, अण्णाप्पा सिदनाळे आदींसह ग्रामपंचायत सदस्य शेतकरी वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी दूधगंगा नदी काठावरील शेतकऱ्यांना पाणी कमी पडल्यानंतर आंदोलन करण्यापेक्षा दूधगंगेतील पाणीच घेऊ नये. ते शिरोळ तालुक्यातील नेते आहेत, हे विसरू नये. शेतकरी नेते असताना राजकीय स्वार्थासाठी भांडवलदारांच्या पंगतीत जाऊन बसणे योग्य नाही.
– ॲड. युवराज घोरपडे

हेही वाचा 

Back to top button