WTC Final मधील पराभवानंतर सचिन तेंडुलकरने विचारला एक प्रश्न...
पुढारी ऑनलाईन डेस्क : जगातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ऑस्ट्रेलियाने दिमाखात आपल्या नावावर केला. सलग दुसर्यांदा अंतिम सामन्यात धडक मारणार्या टीम इंडियाचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. यानंतर टीम इंडियाच्या कामगिरीसह रोहित शर्माच्या कर्णधारपद आणि प्रशिक्षक राहुल द्रविडच्या रणनीतीवर माजी क्रिकेटपटू सवाल करत आहेत.
( WTC final Sachin Tendulkar )टीम इंडियाचा माजी कर्णधार सचिन तेंडुलकर याने एक सवाल करत या पराभवाचे विश्लेषण केले आहे. सचिन नेमकं काय म्हणाला याबाबत जाणून घेवूया …
WTC फायनलमधील टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर सचिन तेंडुलकरने ट्विटरवर लिहिले आहे की, ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमधील विजयाबद्दल ऑस्ट्रेलियन संघाचे अभिनंदन. स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड यांनी पहिल्या दिवशी केलेल्या फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलिया संघाने सामन्यावरील पकड मजबूत केली. सामना त्यांच्या बाजूने वळला. सामन्यात टिकून राहण्यासाठी भारतीय संघाला पहिल्या डावात मोठी धावसंख्या करण्याची गरज होती, पण यामध्ये अपयश आले.’
WTC final Sachin Tendulkar : रविचंद्रन अश्विनला संघात स्थान का दिले नाही?
WTC फायनलमधील भारतीय संघासाठी काही चांगले क्षण होते; पण फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला संघात स्थान का घेण्यात आले नाही, असा सवाल सचिनने केला आहे. रविचंद्रन अश्विन हा तो जगातील नंबर वन कसोटी गोलंदाज आहे. मी सामन्यापूर्वी म्हणालो होतो की चांगले फिरकी गोलंदाज नेहमीच खेळपट्टीवर अवलंबून नसतात. ते हवेतील ड्रिफ्ट्स आणि खेळपट्टीच्या उसळीचा वापर भिन्नतेसाठी करतात.ऑस्ट्रेलियाचे सुरुवातीच्या आठ फलंदाजांपैकी पाच डावखुरे आहेत, असेही सचिन तेंडुलकर याने आपल्या ट्विमध्ये नमूद केले आहे.
Congratulations to Team Australia on winning the #WTCFinal. @stevesmith49 and @travishead34 set a solid foundation on Day one itself to tilt the game in their favour. India had to bat big in the first innings to stay in the game, but they couldn’t. There were some good moments…
— Sachin Tendulkar (@sachin_rt) June 11, 2023
अंतिम सामन्यात भारताचा २०९ धावांनी पराभव
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामन्यात भारतीय संघाला २०९ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तसेच रविचंद्रन अश्विनचा संघात समावेश केला नाही. नाणेफेकीनंतरच अनेक दिग्गजांनी रोहितच्या दोन्ही निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि हे दोन्ही निर्णय भारताच्या पराभवाचे कारण ठरले, अशी चर्चा अशी सुरु झाली आहे.
अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने ऑफस्पिनर नॅथन लायनला संधी दिली. त्याने सामन्यात पाच विकेट घेतल्या. पहिल्या डावात रवींद्र जडेजा आणि दुसऱ्या डावात रोहित शर्माला बाद करून त्याने संघासाठी मोलाची कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४६९ तर दुसऱ्या डावात २७० धावा केल्या. भारतीय संघाला पहिल्या डावात २९६ धावा तर दुसऱ्या डावात 234 धावांपर्यंतच मजल मारता आली.
हेही वाचा :
- WTC Final 2023 :पराभूत मानसिकता
- Rohit Sharma On WTC : पराभवासाठी रोहितने धरले ‘यांना’ जबाबदार, म्हणाला…
- Virat Kohli WTC Final : ‘मला नको कोहलीला विचारा…’ विराटच्या खराब फॉर्मवर गावस्कर संतापले