कोल्हापूर : बोरवडेत पोहायला गेलेल्या शाळकरी मुलीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
बिद्री; पुढारी वृत्तसेवा : विहिरीवर पोहायला गेलेल्या बोरवडे (ता. कागल) येथील 8 वर्षांच्या शाळकरी मुलीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. धनश्री हणमंत साठे असे मुलीचे नाव आहे. या घटनेची नोंद मुरगूड पोलिसांत झाली आहे.
मुलीचे वडील हणमंत साठे हे गावातीलच साठेवाडी येथील विहिरीवर मुलगी धनश्रीला दुपारच्या सुमारास पोहण्यासाठी घेऊन गेले होते. थोडा वेळ पोहून झाल्यानंतर धनश्री पाण्याबाहेर आली. विहिरीच्या कडेला असलेल्या विद्युत पंपाच्या वायरला नजरचुकीने तिचा हात लागला. त्यामुळे तिला विजेचा धक्का बसून जागेवरच बेशुद्ध पडली. तिला मुरगूड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारांपूर्वीच धनश्रीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिच्या कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. तिच्या मागे आई-वडील, बहीण, भाऊ, आजी-आजोबा असा परिवार आहे.