कोठडीतील मृत्यू प्रकरणांवरून चिंतित नाही का? सिब्बल यांचा अमित शहा यांना सवाल | पुढारी

कोठडीतील मृत्यू प्रकरणांवरून चिंतित नाही का? सिब्बल यांचा अमित शहा यांना सवाल

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : कोठडीत असलेल्या लोकांची राजरोस हत्या घडवून आणली जात आहे. यावरून आपण चिंतित नाही का? असा खोचक सवाल सपाचे खासदार कपिल सिब्बल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विचारला आहे. कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारी याचा जवळचा सहकारी संजीव जीवा याची अलीकडेच लखनौ येथील न्यायालयात पोलिसांसमक्ष गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्याचा संदर्भ सिब्बल यांनी दिला आहे.

वर्ष २०१७ ते २०२२ या कालावधीत ४१ लोकांची पोलीस कोठडीत असताना हत्या झाली. हे का आणि कसे? संजीव जीवा याची नुकतीच हत्या झाली. तत्पूर्वी अतिक अहमद आणि अश्रफ यांना गोळ्या झाडून मारण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या तिहार तुरुंगात टिल्लू ताजपुरिया नावाच्या गँगस्टरची क्रूर हत्या करण्यात आली. हे सगळे पाहून गृहमंत्री म्हणून तुम्हाला चिंता वाटत नाही, असे सिब्बल यांनी अमित शहा यांना उद्देशून म्हटले आहे.

Back to top button