बीड : गोदावरी नदीत १७ वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू
गेवराई (बीड); पुढारी वृत्तसेवा : गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावर वसलेले सुरळेगाव या ठिकाणी पोहोण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाला.
तान्हाजी लिंबाजी आरबड (वय १७, रा . सुरळेगाव ता.गेवराई जि . बीड) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, गेवराई तालुक्यातील सुरळेगाव हे गाव गोदावरी नदीच्या काठावर वसले आहे. आज मंगळवारी (दि.१९) रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास सुरळेगाव गावातील तान्हाजी आरबड हा तरूण मित्रासोबत रोजच्याप्रमाणे पोहोण्यासाठी नदीवर गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने गोदावरी नदीतील डोहात बुडू लागला.
ही बाब सोबत असलेल्या तरुणांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. आवाज ऐकून गावातील पट्टीचे पोहणारे शरद भंडारे या तरुणाने सदरील डोहात उडी मारुन तान्हाजीला बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. तान्हाजीचा डोहात बुडाल्याने मृत्यू झाला होता.
तान्हाजी हा नेहमी हसतमुख स्वभावाचा आणि आई, वडिलाला एकुलता एक मुलगा होता. त्याचा मृत्यूने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
चार महिन्यात आठ जणांचा मृत्यू
गोदावरी नदीत बुडून मृत्यू होत असल्याच्या दुर्दैवी घटना गेवराई तालुक्यात वारंवार होताना दिसत आहेत. तालुक्यात मागील चार महिन्यात राक्षसभुवन, संगमजळगाव, मिरगाव येथील घडलेल्या दुर्देवी घटनेत सात जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातच आज सुरळेगाव येथे घडलेल्या घटनेत युवकाचा मृत्यू झाला असून या वारंवार घडणाऱ्या घटना चिंतेचा विषय बनला आहे .
हेही वाचलंत का?