घोड्याबरोबर गाढव पळविला जात आहे : केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांचा काँग्रेसवर हल्लाबोल | पुढारी

घोड्याबरोबर गाढव पळविला जात आहे : केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : “घोड्यांच्या शर्यतीत गाढव पळविला जात आहे,” अशा शब्दांत केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी काँग्रेस व पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्यावर आज (दि.२७) हल्लाबोल केला. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यापासून दोन्ही पक्षांमध्ये सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आणखी तीव्र बनल्या आहेत.

घोड्याच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी तुम्हाला गाढव मिळाला आहे. हा विषय खरे तर गंभीर आणि आत्मपरीक्षण करावयास लावणारा आहे, असा टोला पुरी यांनी मारला. प्रियांका गांधी-वाड्रा यांनी राहुल गांधी यांची तुलना भगवान रामाबरोबर केली होती. त्याचा संदर्भ देत पुरी यांनी ‘कुठे भगवान राम आणि कुठे हे लोक’ असे सांगितले.

माफी मागण्यासाठी मी स्वातंत्र्यवीर सावरकर नाही, असे राहुल गांधी म्हणतात. वास्तविक सावरकरांचे योगदान या लोकांना माहित आहे का? असा सवाल उपस्थित करून पुरी म्हणाले की, न्यायालयाने गांधी यांना शिक्षा दिलेली आहे. त्यामुळे न्यायालयीन प्रकियेनुसार त्यांनी पुढील गोष्टी केल्या पाहिजेत. राजकारणात अतिनाट्य करण्याची गरज नाही. शेवटी जनतेला काय तो निर्णय करू द्यावा.

केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी देखील काँग्रेसवर टीका केली आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द होण्यात भाजपचा हात नाही. कायद्याने आपले काम केले आहे, न्यायालयीन आणि कायदेशीर कारवाईवर काँग्रेस रडारडी करीत आहे. गांधी कुटुंबीय स्वतःला कायद्यापेक्षा वरिष्ठ समजते, याचे हे द्योतक आहे, असे ते म्हणाले.

हेही वाचा : 

Back to top button