मानवी शरीराला सोसणार नाही इतक्या तीव्र उष्णतेच्या लाटेचा भारताला धोका | पुढारी

मानवी शरीराला सोसणार नाही इतक्या तीव्र उष्णतेच्या लाटेचा भारताला धोका

पुढारी ऑनलाईन डेस्क : उन्हाळा सुरू झाला की वाढत्या तापमानाचे आकडे चिंता वाढवणारे असतात. पण यंदाचा उन्हाळा सगळ्यांचीच सत्त्वपरीक्षा पाहणारा ठरण्याची शक्यता आहे. कारण येत्या काही काळात मानवी क्षमतांची कसोटी पहाणाऱ्या उष्णतेच्या लाटा भारताला धडकतील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. आता हा विषय चर्चेत येण्याचं कारण म्हणजे वर्ल्ड बँकेचा नुकताच आलेला रिपोर्ट. ‘हवामान बदलामुळे भारतीय कूलिंग सेक्टरमध्ये निर्माण होणाऱ्या संधी’ हे टायटल असलेल्या रिपोर्टमध्ये भारतात येणार असलेल्या आगामी उष्णतेच्या लाटेबाबत नमूद केलं आहे.

2022 च्या एप्रिल मध्ये दिल्लीने होरपळायला लावणाऱ्या उष्णतेच्या लाटेचा अनुभव घेतला होता. अगदी उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच म्हणजेच मार्चमध्ये दिल्लीच तापमान जवळपास 46 से अंशांपर्यंत जाऊन पोहोचलं होतं. यावेळी येणारी उष्णतेची लाट मानवी सहनशक्तीची मर्यादा पाहणारी असेल असं या रिपोर्टवरुन समोर येत आहे. ऑगस्ट 2021च्या इंटर गवर्नमेन्ट पॅनल ऑफ क्लायमेट चेंज रिपोर्टमध्ये ही भारतीय उपखंडात येऊ घातलेल्या उष्णतेच्या लाटेची पूर्वकल्पना दिली होती. तर G -20 क्लायमेट रिस्क अॅटलस च्या रिपोर्ट नुसार या उष्णतेच्या लाटेची तीव्रता 2036-65 पर्यंत जवळपास 25 टक्क्यांहून जास्त असेल. 38 लाखाहून अधिक कामगार वर्ग हा धोकादायक पातळीत येत असलेल्या ठिकाणी काम करत असतो. त्यामुळे नक्कीच त्यांच्या उत्पादकतेवर परिणाम होतो.

तापमानवाढीसोबतच देशातील कूलिंग साधनांच्या मागणीतही प्रचंड वाढ होते आहे. दिवसाला जेमतेम दोन डॉलर किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या वर्गाला एअर कंडिशन परवडण अवघड आहे. इलेक्ट्रिक फॅन हा यावरचा उपाय आहे. पण त्याची किंमत आणि उपलब्धता याचे सक्षम पर्याय उपलब्ध नाहीत. त्यामुळे हा पर्यायही ठोस आहे याची शाश्वती नाही. अनेक गरीब लोक या उष्णतेच्या लाटेत पुरेशी कूलिंगची साधन नसलेल्या, पुरेसे हवेशीर नसलेल्या घरात राहणारे आहेत. त्यांच्यावर या उष्णतेचा लाटेचा जास्त परिणाम होण्याची शक्यता आहे. अर्थात अशा प्रकारची जीवनशैली जीवावर बेतणारी असू शकते असंही या रिपोर्टमध्ये नमूद केलं आहे/

Back to top button