श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवनातून क्रांतिकारकांची कामगिरी नव्या पिढीला कळेल- अभिताभ गुप्ता | पुढारी

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवनातून क्रांतिकारकांची कामगिरी नव्या पिढीला कळेल- अभिताभ गुप्ता

पुणे, पुढारीवृत्तसेवा : ऐतिहासिक, धार्मिक आणि स्वातंत्र्य लढ्याची पार्श्वभुमी असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवन आणि संग्रहालयच्या माध्यमातून आपल्या क्रांतिकारकांनी केलेली कामगिरी नव्या पिढीला कळेल. तसेच हे भवन एक पर्यटन स्थळ म्हणूनही ओळखले जाईल, असे गौरवोद्गार पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी काढले.

‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’द्वारे नूतनीकरण करण्यात आलेल्या देशातील पहिला सार्वजनिक गणपतीच्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवन व संग्रहालयाचे उद्घाटन पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रसिध्द ब्लॉगर व शेफ जुगनू गुप्ता, उत्सव प्रमुख, विश्वस्त व युवा उद्योजक पुनीत बालन, अध्यक्ष संजीव जावळे, आरएमडी फाऊंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल-बालन, उपाध्यक्षा शोभाताई धारीवाल यांच्यासह मानाच्या गणेश मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी गुप्ता यांच्या हस्ते श्रींमत भाऊसाहेब रंगारी गणपतीची सपत्नीक आरती करण्यात आली. त्यानंतर नुतनीकरण करण्यात आलेल्या भवनाचे व संग्रहालयाचे उद्घाटन झाले. यावेळी कलश, शाल व श्रीफळ देऊन गुप्ता दांपत्याचा सत्कार करण्यात आला.

गुप्ता म्हणाले, वर्षभरापूर्वी मी हे भवन पाहिले होते, आता नुतनीकरणानंतर अत्यंत सुंदर आणि स्वच्छ अशी ही वास्तू झाली आहे. जेव्हा पर्यटक शनिवारवाडा व इतर गोष्टी पाहण्यासाठी पुण्यात येतील, तेव्हा हे भवनही पहायला नक्की येतील. आपल्या स्वातंत्र्य लढयाचा जो इतिहास आहे आणि क्रांतिकारकांनी जी काही कामगिरी केली, हे नव्या पिढीला या माध्यमातून कळणार आहे. धार्मिक, ऐतिहासिक आणि स्वातंत्र्य लढ्याची पार्श्वभुमी असलेल्या या भवनाचे नुतनीकरण केल्याबद्दल पुनीत व जान्हवी बालन आणि ट्रस्टचे सर्व विश्वस्त यांचे यावेळी त्यांनी अभिनंदन केले.

काय आहे या भवनात नक्की

क्रांतिकारकांचे माहेरघर असलेल्या या भवनात गुप्त दालन, भुयारी रस्ते, ब्रिटीशकालीन ऐतिहासिक शस्त्रास्त्रे, ‘ईस्ट इंडीया कंपनी’ची पेटी व वाड्याला असलेली सेंट्रल लॉकिंग सिस्टीम इत्यादी आकर्षणांबरोबरच पर्यटकांसाठी ऑडिओ व व्हिडिओ क्लिपही असणार असून हे भवन सर्वांसाठी विनाशुल्क खुले असणार आहे.

देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी श्रींमत भाऊसाहेब रंगारी, लोकमान्य टिळक आदी क्रांतिकारकांनी केलेली चळवळ या भवनातून सुरू केली होती. जवळपास १४० वर्षे जुने असलेले हे भवन नुतनीकरण करण्याची गरज होती. त्यानुसार ‘इंद्राणी बालन फाऊंडेश’ने पुढाकार घेऊन ‘श्रींमत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’समवेत या भवनाचे नुतनीकरण केले, याचे समाधान आहे.

                                                                   – पुनीत बालन, उत्सव प्रमुख व विश्वस्त.

Back to top button