राज्यात आज, उद्या बहुतांश ठिकाणी पाऊस
मुंबई; पुढारी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने मुंबईसह कोकण, मराठवाडा आणि विदर्भात हजेरी लावली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही हलका पाऊस पडत आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
वाचा : रत्नागिरी जिल्ह्यात आजपासून मुसळधार
कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज शुक्रवारी (दि.९) बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. उद्या शनिवारी (दि.१०) देखील या भागात तुरळक ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर रविवारी ११ जुलै रोजी मध्य महाराष्ट्रातील घाट भागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात ९ ते १२ जुलै या कालावधीत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खाते, कुलाबा, मुंबई यांच्याकडून ही माहिती देण्यात आली आहे. आठवडाभराच्या ब्रेकनंतर येथे गुरुवारी पावसाने पुन्हा सुरुवात केली. त्यामुळे बळीराजाला दिलासा मिळाला.
वाचा : शिवसेना म्हणते, ‘हा तर पंकजा मुंडेंना संपूर्ण खतम करण्याचा डाव’
गडचिरोली जिल्ह्यात दमदार पाऊस पडत आहे. चामोर्शी तालुक्यातील चिचडोह बॅरेजचे सर्व ३८ दरवाजे उघडण्यात आले आहेत.
दरम्यान, १० जुलैपासून पाऊस पुन्हा दमदार सुरुवात करेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मान्सून जून महिन्यात अतिवृष्टीने सक्रिय झाला होता. मात्र, जुलै महिन्यात पावसाने ब्रेक घेतला होता. गेले अनेक दिवस पावसाने दडी मारली होती. पण आता पावसाने सुरुवात केल्याने शेतकर्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.