‘मांसाहार’वरून JNU मध्ये हाणामारी, विद्यार्थी संघटनांमधील वाद उफाळला | पुढारी

‘मांसाहार'वरून JNU मध्ये हाणामारी, विद्यार्थी संघटनांमधील वाद उफाळला

नवी दिल्ली, पुढारी वृत्‍तसेवा : दिल्लीतील जवाहरलाल नेहरु अर्थात जेएनयू विद्यापीठ भाजपप्रणित आणि डाव्या पक्षांशी संलग्न आहे. आता जेएनयूएसयू विद्यार्थी संघटनेमधील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. रविवारी दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीत दोन्ही संघटनेचे विद्यार्थी जखमी झाले आहेत.

अभाविपचे लोक मांस खाण्यापासून रोखत असल्याचा आरोप डाव्या संघटनेकडून करण्यात आला आहे. तर रामनवमी पुजेत विघ्न आणणे हा डाव्यांचा डाव होता, असे प्रत्युत्तर अभाविपकडून देण्यात आले आहे.

दरम्यान, जेएनयूचे नामांतरण वीर सावरकर विद्यापीठ करावे, अशी मागणी हिंदू महासभेने केली आहे. मात्र डाव्या संघटनेकडून मांसाहारचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. मात्र त्यांचा मुख्य उद्देश रामनवमीनिमित्त होणार्‍या पुजेत विघ्न आणण्याचा होता. असे अभाविपच्या एका पदाधिकार्‍याने सांगितले.

दरम्‍यान, हिंदू सणांवर जाणुनबुजून हल्ला करण्याचे षड्यंत्र होत आहे. यांचा हा प्रयत्न यशस्वी होऊ दिला जाणार नाही, असे पदाधिकारी  उमेश यांनी सांगितले. तसेच, अभाविपने आपले 15 कार्यकर्ते जखमी झाल्याचे सांगितले आहे. तर डाव्या संघटनेने 50 कार्यकर्ते जखमी झाले असल्याचा दावा केला आहे. दोन्ही संघटनांनी एकमेकांविरोधात पोलिसांत गुन्हे दाखल केले आहेत.

जेएनयूमधील हिंसाचारानंतर आता त्यावरून राजकारणास सुरुवात झाली आहे. हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी केंद्र सरकारकडे विद्यापीठाचे नाव बदलण्याची मागणी केली आहे. वीर सावरकर यांचे नाव विद्यापीठास दिले जावे, असे चक्रपाणी यांनी गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांना याबाबत पत्र पाठवले आहे. यामध्ये जेएनयूला फुटीरतावाद्यांनी तसेच तुकडे – तुकडे गँगने घेरले असून पाकिस्तानच्या इशार्‍यावरुन येथे वारंवार देशविरोधी घोषणा दिल्या जातात. कधी हिंदू देव देवतांचा तर कधी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान केला जातो, असे चक्रपाणी म्‍हणाले. दरम्यान, खासदार बिनॉय विश्वम यांनी या मुद्यावरुन आरएसएसवर टीका केली आहे. जेएनयूमधील खेळ आरएसएसने बंद केला पाहिजे, असे त्‍यांनी सांगितले.

हेही वाचा  

Back to top button