'युक्रेनमध्ये मृत्यू झालेल्या कर्नाटकच्या नवीनचे पार्थिव तीन दिवसांत आणणार'
नवी दिल्ली/बंगळूर ; पुढारी वृत्तसेवा : आठवड्यापासून सुरू असलेले युद्ध… सगळे खाद्यपदार्थ संपलेले… भुकेने व्याकुळ होणारा जीव… अशा अवस्थेत मंगळवारी सकाळी तो घरातून बाहेर पडला… किराणा दुकानासमोर दोन तास रांगेत उभा राहिला… पण त्याला खाद्यपदार्थ मिळण्याआधीच तो रशियन सैनिकांनी केलेल्या गोळीबाराचा शिकार ठरला… कर्नाटकाच्या हावेरी जिल्ह्यातील चळगेरी गावच्या नवीन शेखरप्पा ग्यानगौडर (वय 20) या विद्यार्थ्याची ही करुण कहानी. (Ukraine)
या युद्धात मारला गेलेला तो पहिला भारतीय. तो युक्रेनमध्ये एमबीबीएसच्या चौथ्या सेमिस्टरमध्ये शिकत होता. मंगळवारी सकाळी रशियन सैनिकांनी खार्किव्हमधील गव्हर्नर इमारतीनजीक गोळीबार केला. यात नवीनचा मृत्यू झाला.
Ukraine : सरकारविरुद्ध घोषणाबाजी
नवीनच्या मृत्यूचे वृत्त समजल्यानंतर चळगेरी (ता. राणेबेन्नूर) येथील स्थानिकांनी केंद्र तसेच राज्य सरकारविरुद्ध संताप व्यक्त केला. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारकडून गतीने हालचाली झालेल्या नाहीत, याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. चळगेरीतील आणखी काही पालकांनी आपली मुले युक्रेनमध्ये असल्याचे सांगितले. त्यांना लवकरात लवकर सुखरुप परत आणण्याचे आवाहन त्यांनी केले.
माझ्या मुलालाही सुखरूप आणा!
आपल्या मुलाचेही बरेवाईट होण्याआधी त्याला युक्रेनहून परत आणण्यात यावे, अशी मागणी नवीनच्या वडिलांचे मित्र व्यंकटेश यांनी सरकारकडे केली आहे. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, केंद्र सरकारने युक्रेनमध्ये अडकलेल्यांना तातडीने मायदेशी आणण्याची व्यवस्था करावी.
Shocked on death of Naveen Gyanagoudar, student from Karnataka, in bomb shelling in Ukraine. My deep condolences to the family. May his soul rest in peace.
We are constantly in touch with MEA and will make all efforts to bring back his mortal remains.
— Basavaraj S Bommai (@BSBommai) March 1, 2022
केंद्राने विलंब केल्यानेच आज नवीनला जीव गमवावा लागला. आपल्या देशात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी 2 ते 3 कोटींची गरज भासते. एवढे पैसे आणायचे कोठून, असा प्रश्न त्यांनी केला. या घटनेत आणखी एकजण जखमी झाला.
हावेरीतील दोघेजण जखमी झाल्याची माहिती मुख्यमंत्री बोम्मई यांनी जाहीर केली. नवीनचा मृतदेह परत आणण्याची तयारी सुरू आहे. आगामी तीन दिवसांत मृतदेह आणण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
नवीनशी सकाळीच बोललो होतो!
सकाळीच आपल्या मुलाने मोबाईलवर संपर्क साधला होता. त्याच्याशी बोलणे झाले होते. पण, दुपारी त्याचा मृत्यू झाला. यावर विश्वासच बसत नसल्याचे नवीनचे वडील शेखरप्पा यांनी सांगितले. नवीनच्या पश्चात आई, वडील आणि भाऊ आहेत.