पुणे : पुढारी वृत्तसेवा
वैकुंठ स्मशानभूमीत 35 लाख रुपये खर्चून उभारण्यात येणार्या प्रकल्पासाठी महापालिकेने 15 लाखांचा सल्लागार नेमला आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला नुकतीच स्थायी समितीने मंजुरी दिल्याने महापालिकेचा अजब कारभार उजेडात आला आहे.
वैकुंठ स्मशानभूमीत शवदहनासाठी तीन विद्युत दाहिन्या, एक गॅसदाहिनी आणि लाकडावर अंत्यसंस्कारांसाठी चार शेड कार्यान्वित आहेत.
या दाहिन्या आणि चार शेडमधून बाहेर पडणार्या धुरामुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी आठ स्वतंत्र स्क्रबर आणि ब्लोअर यंत्रणा बसविण्यात आलेली आहे. या धुरावर प्रक्रिया करून तो 30 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या चिमणीमधून हवेमध्ये सोडण्यात येतो. मात्र, या धुरामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते, अशा तक्रारी या परिसरातील रहिवाशांनी महापालिकेकडे लेखी स्वरूपात आणि पीएमसी पोर्टलवर ऑनलाइन स्वरूपात केल्या आहेत.
तसेच राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात दावा दाखल केला आहे. उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या सर्व बाबींचा विचार करून वैकुंठ स्मशानभूमीतील प्रदूषण कमी करण्यासाठी तेथे अस्तित्वात असलेल्या सर्व यंत्रणांची नागपूर येथील नॅशनल एन्व्हायर्मेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (निरी) या केंद्र सरकारच्या अखत्यारीतील संस्थेकडून तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर प्रदूषण कमी करण्यासाठी वैकुंठ स्मशानभूमीत 35 लाख रुपये खर्च करून एपीसी सिस्टिम (एअर पोल्युशन कंट्रोल) बसविण्यात येणार आहे.
या एपीसी युनिटचे डिझाइन करणे, निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी टेक्निकल स्पेसिफिकेशन पुरविणे, टेक्निकल सपोर्ट देणे, एपीसी सिस्टिमचे एक वर्ष कालावधीसाठी परफॉर्मन्स टेस्टिंग करणे, आवश्यकता भासल्यास यंत्रणेत सुधारणा करणे आणि इतर प्रदूषणविषयक समस्यांसाठी सल्लागार कंपनीची नेमणुक केली जाणार आहे. एक वर्षाच्या कामाच्या सल्ल्यासाठी 15 लाख रुपये देण्यात येणार आहेत. यासंदर्भातील प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.
https://youtu.be/m5yyfqkYqY4