औरंगाबाद : मराठा आरक्षणाबाबत 15 दिवसांत भूमिका स्पष्ट करा
औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला ज्या सरकारने आरक्षण दिले, तेच आता सत्तेत आहे. राज्य सरकारला आमचे प्रश्न कळले आहेत, सरकारला आम्ही आता दोन पर्याय देत आहोत. यामध्ये आरक्षणप्रश्नी सरकार रिव्ह्यू पिटिशनमध्ये जाणार का व किती दिवसांत निकाली काढणार व जर आरक्षणाबाबत नव्याने प्रक्रिया पूर्ण करणार असाल तर किती दिवसांत पूर्ण होणार, हे पर्याय आम्ही सरकारसमोर ठेवले आहेत. सरकारने येत्या 15 दिवसांच्या आत मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी; अन्यथा मराठा क्रांती मोर्चा वेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत घेण्यात आला.
मराठा क्रांती मोर्चाची गुरुवारी बैठक घेण्यात आली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विनोद पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली.
यावेळी पाटील म्हणाले की, आता मराठा क्रांती मोर्चाचा मराठा हाच चेहरा वापरला जाणार असून, राज्य सरकारने, संपूर्ण राज्याने तसेच न्यायालयानेही मराठा समाजाचे आंदोलन पाहिले आहे. त्यामुळे आम्ही केलेल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर वेगळ्या पद्धतीने आंदोलन करणार आहोत. राज्य सरकारला खुर्च्या टिकवायच्या असतात आणि विरोधी पक्षाला खुर्चीत यायचे असते. त्यामुळे आता लोकसभेला 17, तर विधानसभा निवडणुकीसाठी 20 महिने आहेत. त्यामध्ये आरक्षण तुम्ही कशा पद्धतीने देणार, असा सवालही यावेळी सरकारला करण्यात आला.
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात राज्य सरकारकडे निवेदन देण्यासाठी व मराठा क्रांती मोर्चाच्या महिला, तसेच क्रांती मोर्चातील विविध संघटनांचे पदाधिकारी, आरक्षणाचे अभ्यासक, प्रतिनिधी मुंबईला जाऊन चर्चा करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. राज्य सरकारने सुपरन्युमरिकचा निर्णय घेतला असला, तरी अनेक विभागांच्या अधिकार्यांनी राज्य सरकारकडे याद्यांसंदर्भातील माहिती पाठवली नाही. या याद्या तत्काळ सरकारकडे पाठवाव्यात, तसेच खासगी संस्थेमध्ये केजी टू पीजीपर्यंतचे निम्मे शुल्क सरकारने ‘सारथी’मार्फत भरावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
पत्रकार परिषदेपूर्वी घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये मराठा आरक्षणासोबतच कोपर्डी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, सारथी याबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीमध्ये राजेंद्र जंजाळ, अभिजित देशमुख, प्रा. चंद्रकांत भराट, डॉ. शिवानंद भानुसे, सुरेश वाकडे, सतीश वेताळ पाटील, राजेंद्र दाते पाटील, किशोर चव्हाण, सुनील कोटकर, अप्पासाहेब कुढेकर, रमेश गायकवाड, रवींद्र काळे पाटील, सुवर्णा मोहिते, सुकन्या भोसले आदींची उपस्थिती
होती.