औरंगाबाद : सरकारच्या निर्णयास उशीर; सव्वा महिन्यात मोठ्या गणेशमूर्ती बनवणे अशक्य, मूर्तीकारांची खंत
औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सव अवघ्या महिन्यावर येऊन ठेपला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेश मूर्तींच्या उंचीवरील निर्बंध उठवले आहेत. त्यामुळे गणेश मंडळांसह भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मूर्तींवरील उंचीच्या मर्यादा हटवण्यात आल्या असल्या तरी यंदा चार फुटांपेक्षा अधिक उंचीच्या मूर्ती बनवणे कठीण आहे. कारण गणेशोत्सव हा सव्वा महिन्यावर येऊन ठेपला आहे. एवढ्या कमी कालावधीत मोठ्या मूर्ती बनवणे शक्य नसल्याची खंत शहरातील मूर्तिकारांनी व्यक्त केली आहे.
शहरातील अनेक सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्ती मोठ्या उंचीच्या असतात. मात्र, शासनाने कोरोनामुळे गणेश मूर्तींच्या उंचीवर मर्यादा आणल्या होत्या. चार फुटांपेक्षा अधिक उंचीच्या मूर्ती स्थापन करण्यावर बंदी घालण्यात आल्याने गेल्या वर्षी काही मूर्तिकारांनी तयार केलेल्या उंचीच्या गणेश मूर्ती तशाच शिल्लक राहिल्या होत्या. त्यामुळे यंदा मूर्तिकारांनी चार ते पाच फूट उंचीच्याच मूर्ती तयार केल्या आहेत. सध्या मूर्तींना रंग देण्याचे काम सुरू आहे. त्यातच शिंदे सरकारने गणेश मूर्तींवरील निर्बंध उठवल्याने गणेश मंडळांकडून मोठ्या गणेश मूर्तींची मागणी होत आहे. मात्र गणेशोत्सव अवघ्या महिन्यावर येऊन ठेवला असताना ऐनवेळी मोठ्या मूर्ती बनवणे कठीण असल्याचे मत मूर्तिकारांकडून सांगण्यात येत आहे.
हेही वाचा :