कोणाबाबत आघाडी करायची ते काकाच ठरवतील | पुढारी

कोणाबाबत आघाडी करायची ते काकाच ठरवतील

उत्तर सोलापूर : पुढारी वृत्तसेवा आगामी निवडणुकीत आघाडी कोणासोबत करायची, कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत निर्णय घेण्याचे सर्व अधिकार बळीरामकाका साठे यांनाच असतील. तेव्हा उमेदवार कोण आहे हे न पाहता उमेदवार राष्ट्रवादीचा आहे हे लक्षात घेऊन एकदिलाने सर्वांनी काम करावे, असे भावनिक आवाहन सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र साठे यांनी केले.

आगामी जि.प., पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक गुरुवारी वडाळा येथे घेण्यात आली. त्यावेळी साठे बोलत होते. ते पुढे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष काकासाहेब साठे व आमदार यशवंत माने यांनी तालुक्याच्या विकासाला मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे तालुक्यात पक्षाला चांगले वातावरण आहे. तेव्हा आता राष्ट्रवादीची सत्ता पंचायत समितीमध्ये येण्यासाठी कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करा, असेही साठे म्हणाले.

राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रल्हाद काशीद अध्यक्षस्थानी होते. अरुण बारसकर, कार्याध्यक्ष सुनील भोसले, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश चोरेकर, छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील, जितेंद्र शिलवंत, हरिदास शिंदे, धनंजय माने, गणेश पाटील, भाऊ लामकाने, मनोज साठे, शिवाजी पाटील, जितेंद्र भोसले, राजाराम गरड, मेजर आवताडे, दीपक अंधारे, प्रवीण भालशंकर, नासीर जहागीरदार, विनोद पांढरे, रतिकांत पाटील, विशाल मोरे, कल्याण काळे यावेळी उपस्थित होते. पक्ष वाढवायचा असेल तर कार्यकर्त्यांनी आपसातील मतभेद विसरुन मिळून मिसळून काम करण्याची गरज असल्याचे सुनील भोसले यांनी सांगितले.

गेल्या 50 वर्षांत काका साठे यांनी स्वतःच्या प्रपंचाकडे न पाहता तालुक्यातील सामान्य लोकांचा प्रपंच सुखाचा व्हावा यासाठी जीवाचे रान केले. याची जाणीव ठेऊन कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे, असे चोरेकर यांनी आवाहन केले. बीबीदारफळ ग्रामपंचायतीमध्ये भाजपची सत्ता असताना तीन लाखांच्या निधीसाठी तीन वर्षे चंद्रकांत पाटलांकडे हेलपाटे मारावे लागले. मात्र काका साठे व आमदार माने यांनी क्षणाचाही विलंब न करता बीबीदारफळसाठी एकाच हेलपाट्यात 20 लाखांचा निधी दिल्याचे शिवाजी पाटील यांनी सांगितले. प्रत्येक गावात जाऊन राष्ट्रवादीचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे सांगून तालुकाध्यक्ष काशीद म्हणाले, जितेंद्र साठे यांनी अचानक बैठक बोलाविली तर एवढ्या मोठ्या संख्येने प्रमुख कार्यकर्ते आले. काका साठे म्हणजे कृष्णामाई नदी आहेत. आपण सगळे एकत्र झालो तर तालुका राष्ट्रवादीमय होईल. यावेळी अमोल पाटील, हरिभाऊ घाडगे, हरिदास शिंदे, धनंजय माने यांचीही भाषणे झाली.

Back to top button