IND vs ZIM : झिम्बाब्वेला व्हाईट वॉश; भारताने एकदिवसीय मालिका 3-0 ने जिंकली | पुढारी

IND vs ZIM : झिम्बाब्वेला व्हाईट वॉश; भारताने एकदिवसीय मालिका 3-0 ने जिंकली

हरारे; वृत्तसंस्था : के. एल. राहुलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने झिम्बाब्वेला तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 3-0 असा व्हाईट वॉश दिला. भारताने तिसरा सामना 13 धावांनी जिंकला. पहिले दोन सामने एकतर्फी जिंकणार्‍या भारताला तिसर्‍या सामन्यात मात्र यजमान संघाकडून कडवी झुंज मिळाली. सिकंदर रझाने (115) शतकी खेळी करून विजय द़ृष्टिक्षेपात आणला होता; परंतु शेवटच्या क्षणी तो बाद झाला, अन् झिम्बाब्वेच्या क्लीन स्वीपवर शिक्कामोर्तब झाले.(IND vs ZIM)

शुभमन गिल आणि ईशान किशन यांच्या 140 धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारताने झिम्बाब्वेसमोर 290 धावांचे लक्ष्य ठेवले. त्यानंतर झिम्बाब्वेने 276 धावा केल्या. तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने आठ गड्यांच्या मोबदल्यात 289 धावा केल्या. भारताकडून शुभमन गिलने सर्वाधिक 130 धावा केल्या. त्याच्याशिवाय ईशान किशनने 50, धवनने 40 धावा केल्या. (IND vs ZIM)

भारतीय कर्णधार के. एल. राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राहुल आणि शिखर धवन या जोडीने पहिल्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी केली. कर्णधार के. एल. राहुल 30 धावा करून बाद झाला. कर्णधार के. एल. राहुलसाठी ही मालिका निराशाजनक ठरली आहे. तीन सामन्यांमध्ये तो केवळ 31 धावा करू शकला आहे. त्यानंतर उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेला शिखर धवन 40 धावा करून बाद झाला.

यानंतर शुभमन गिल आणि ईशान किशन यांची जोडी जमली. गिलने 51 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. टीम इंडियाच्या दोन युवा फलंदाजांनी झिम्बाब्वेला जोरदार तडाखा दिला. गिल-किशनमध्ये तिसर्‍या विकेटसाठी 99 चेंडूंत शतकी भागीदारी झाली. ईशान किशनने शानदार फलंदाजी करताना आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील हे दुसरे अर्धशतक आहे. पण, अर्धशतकानंतर ईशान किशन धावबाद झाला. यानंतर भारतीय संघाला गळती लागली. दीपक हुडा केवळ एक धाव काढून ब्रॅड इव्हान्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. दरम्यान, शुभमन गिलने 82 चेंडूंत आपले पहिले शतक पूर्ण केले, यात त्याने 12 चौकार ठोकले. अष्टपैलू अक्षर पटेल केवळ एक धाव काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. अक्षरला सिकंदर रझाने झेलबाद केले. शतकवीर शुभमन गिल 130 धावांवर तंबूत परतला. शार्दूल ठाकूरच्या रूपाने भारताला आठवा धक्का बसला. त्याने सहा चेंडूंत नऊ धावा केल्या. यासह इव्हान्सने या सामन्यात पाच बळी घेण्याचा टप्पा पूर्ण केला. त्याने प्रथमच वन-डेत पाच विकेटस् घेतल्या आहेत.

 

Back to top button