Goa Assembly Election : विरोधक एकवटले; भाजपही सज्ज | पुढारी

Goa Assembly Election : विरोधक एकवटले; भाजपही सज्ज

गोव्याचा राजकीय अवकाश भौगोलिक अर्थाने छोटा असला, तरी गुंतागुंतीचा आहे. हा अवकाश व्यापण्यासाठी स्थानिक महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षासह (मगोप) तृणमूल काँग्रेसने युती केलेली आहे. त्यामुळे मगोपला ‘व्हिटॅमिन एम’ टॉनिक मिळाले. त्यांच्या छावणीत आम आदमी पक्षही आहे. या एकवटलेल्या विरोधकांचे आव्हान भाजप कसे पेलतो, हे पाहावे लागेल. (Goa Assembly Election)

गोव्यात विधानसभा निवडणुकीची (Goa Assembly Election) लगीनघाई धुमधडाक्यात सुरू आहे. सध्याच्या विधानसभेची मुदत 15 मार्च 2022 रोजी संपते. फेब्रुवारीत निवडणुका अपेक्षित आहेत. सध्या एखाद्या पक्षात असलेले उद्या कुठे असतील, काही सांगता येत नाही. निकालानंतरही कोण कोणाच्या मांडवात जाईल, त्याचाही काही नेम नाही. या आयाराम-गयाराम संस्कृतीमुळे ‘मेरी कोई नीती नही, यही मेरी नीती है’ हेच गोव्याच्या राजकारणाचे व्यवच्छेदक लक्षण. गोव्यासाठी हे विशेष अजिबातच नाही. अशी सत्तेसाठीची साठमारी गोव्याने किमान तीन दशकांहून जास्त काळ अनुभवली आहे.

2017 च्या स्थितीकडे पाहताना…

2017 च्या निवडणुकीत काँग्रेसला 17, भाजप 13, गोवा फॉरवर्ड 3, मगोप (महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष) 3 आणि अपक्ष 3, राष्ट्रवादी काँग्रेस 1 असे पक्षीय बलाबल होते. 13 जागा मिळालेल्या भाजपने बहुमतासाठीचा 21 हा जादुई आकडा चतुराईने जमवला आणि सत्ता पटकावली. याचे कारण सर्वांत मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसचा निर्णयास झालेला पारंपरिक विलंब. जे दिल्लीत तेच गोव्यात. आयुष्याच्या उत्तरार्धाकडे झुकलेल्या पाचही माजी मुख्यमंत्र्यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हावयाचे होते.

काँग्रेसचे काहीच ठरेना. दरम्यान, भाजपने मगोप, गोवा फॉरवर्ड, अपक्षांना हाताशी धरले आणि काँग्रेस हात चोळत बसली. सरकारची गाडी सुरू झाल्यावर गोवा फॉरवर्ड, मगोप आणि एक अपक्ष दात दाखवून सरकारवर सतत गुरगुरत होते. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाची त्यांना पोटदुखी होती. योग्य वेळ येताच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांना घरचा रस्ता दाखवला. याचे कारण काँग्रेसमधील 10 आमदार रातोरात भाजपवासी झाले.

अधिकृत पहिली युती जाहीर (Goa Assembly Election)

भाजप, काँग्रेस, आप म्हणजेच आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, स्थानिक पक्ष असलेले मगोप म्हणजे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, गोवा सुराज (रिव्होल्युशनरी गोवन्स), गोवा फॉरवर्ड असे पक्ष रिंगणात आहेत. विरोधक तीन-चार महिने युतीविषयी एकमेकाला जोखत होते; तुटेपर्यंत न दुखावता स्वबळाची भाषा करत होते. 2017 च्या वेळीही असेच चित्र होते. आता निवडणूकपूर्व युती आकाराला आली आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष (मगोप), तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्ष एकत्रित आले आहेत.

या तिन्ही पक्षांची भाजपला सत्तेपासून रोखण्याची भाषा आहे. त्यासाठी निवडणुकांना संघटित सामोरे जाण्याची तयारी झाली आहे. या पक्षांच्या एकत्रित येण्यामुळे मतविभागणीचा धोका टळू शकतो. परिणामी, भाजपचा सत्तेकडे जाणार्‍या मार्गात अडथळे निर्माण होतील, असा होरा आहे. सुमारे वीस-पंचवीस हजारांच्या मतदारसंख्येचे एकूण चाळीस विधानसभा मतदारसंघ आहेत. येथे पंचवीस-पन्नास ते शंभर मतांच्या फरकाने जय-पराजय ठरतो.

त्यामुळे मत विभागणीवर जास्त भिस्त ठेवूनही डावपेच आखले जातात. यापूर्वी विरोधकांच्या युतीच्या केवळ बोलबालाच होता. आता युतीचे एक चित्र तरी स्पष्ट झाले. नवे सहकारी या छावणीत दाखल होऊ शकतात. तसे झाल्यास मात्र संघर्ष निकराचाच होईल. निवडणूक पूर्वीचे आणि नंतरच्या चित्रामध्ये मात्र मोठे अंतर असू शकते. निकालानंतर कुंपणावरची मंडळी सत्तेसाठी कोठेही उड्या मारून माकडांना लाजवू शकतात.

भाजपची सर्वंकष सज्जता

दहा वर्षे सत्तास्थानी असलेल्या भाजपला सध्या कमालीच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. निवडणुकीत काय होऊ शकते, याची पुरेपूर, नेमकी जाण पक्षाला आहे. त्यामुळे 21 हा जादुई आकडा गाठण्यासाठी सहा महिन्यांपासूनच त्यांनी काम सुरू केले.

पहिल्या, दुसर्‍या फळीतील कार्यकर्त्यांशी समन्वय-संवाद, निवडून येण्याच्या उमेदवारांच्या क्षमतेची चाचपणी, पदांची, मंत्रिपदाची ग्वाही, अल्पकालावधीसाठी नवीन चेहर्‍यास मंत्रिपदी बसविण्याचा विचार, जाती-धर्माचे कार्ड, आश्वासनांची खैरात, माध्यम व्यवस्थापन आदी सर्व विकल्प विलक्षण ताकदीने भाजप वापरत आहे. सत्ताधारीच असल्याने साधनसामग्रीचा तर प्रश्नच नाही. आम आदमी पक्षाने भंडारी समाजाचा मुख्यमंत्री करणार, असे जाहीर केले.

लागलीच भाजपने भंडारी समाजाचे वजनदार नेते, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनाच भाजपमध्ये घेतले. या एका उदाहरणावरूनही ‘आयदर हूक ऑर क्रूक’ खेळी लक्षात येते. 2017 प्रमाणे निकालानंतरची यातायात करावी लागू नये, यासाठीची बेरीज सुरू आहे. मूळ भाजपचे नसणारे पंधरापेक्षा जास्त आणि ताकदीचे उमेदवार भाजपकडे आहेत. त्यांची निवडून येण्याची क्षमताही आहे. निवडणुकीपूर्वीच सर्व सज्जतेने निम्मी लढाई अगोदरच जिंकण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.

काँग्रेसचीही मोठी धडपड

प्रमुख विरोधी काँग्रेसचे आमदार 17 होते, आता ते चार राहिलेत. गोवा फॉरवर्ड दोन, अपक्ष तीन, राष्ट्रवादी काँग्रेस एक, मगोप एक असे सध्याचे राजकीय बलाबल आहे. सत्ताधारी भाजपकडे 27 आमदार आहेत. काँग्रेसला मानणारे जनमानस आहे. भाजपसारखे जाळे नसले, तरी काही पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत. गटबाजी नेत्यांमध्ये आहे. काँग्रेसला मानणार्‍या मतदारांत नव्हे. जाहीर चिखलफेक करण्यात नेते मश्गुल असतात.

माजी मुख्यमंत्री दिगंबर कामतही भाजपत जाणारच नाहीत, असा निर्वाळा देता येत नाही. ते यापूर्वीच जाणार होते, असे सूतोवाच त्यांच्याच पक्षाचे माजी उपमुख्यमंत्री पण आता ‘आप’मध्ये प्रवेश केलेले दयानंद नार्वेकर यांनी केले होते. 2017 मध्येच दिगंबर यांच्या नावाची चर्चा होती आणि आताही ती आहे. खिळखिळी काँग्रेस एकसंध ठेवण्याचे आव्हान पक्षाचे नेते पी. चिदबंरम, दिनेश गुंडू राव यांच्यासमोर आहे. मागून नव्हे तर वरातीच्या पुढे घोडे यथोचित गतीने ते कसे दामटतात पाहावे लागेल.

आप, तृणमूलकडे ताकदीची रसद

गोव्याचे राजकीय अवकाश छोटे आहे; पण ते तितकेच गुंतागुंतीचे आहे. या अवकाशात स्थान पटकावण्यासाठी ‘आप’ दहा वर्षांहून जास्त काळ निकराने लढतोय. आता तृणमूलचीही दमदार एंट्री झाली आहे. आपची प्रचारातील आघाडी कायम आहे. प्रचाराबाबत तृणमूलचे आपच्या पावलावर पाऊल आहे. नवनवीन संकल्पनांची स्वप्ने ते दाखवत आहेत. घोषणांबाबत आप क्रियावादी तर अन्य पक्ष विशेषतः सत्ताधारी भाजप प्रतिक्रियावादी असे चित्र कायम आहे.

यावेळी विधानसभेत प्रवेश नक्की होईल, याविषयी ‘आप’च्या मंडळींना खात्री वाटते. हे पक्ष राज्यात स्वतःला सिद्ध करू पाहताहेत. राजकीय रेष उमटवण्यासाठी ते जंगजंग पछाडत आहेत. गोव्यातले एका अर्थाने प्रयोगशील, मोठी रसद असणारे असे दोन्ही पक्ष आहेत. मगोप या गोव्यातील जुन्या-जाणत्या पक्षाला त्यांनी सोबत घेतले आहे. त्यांना गोमंतकीय माणूस कसा प्रतिसाद देतो, ते समजण्यासाठी वाट पाहणे, इतकेच तूर्त हाती राहते.

सुरेश गुदले

Back to top button