देशात मासे खाण्याचे प्रमाण वाढले | पुढारी

देशात मासे खाण्याचे प्रमाण वाढले

प्रशांत वाघाये

नवी दिल्ली : भारतात गेल्या दहा वर्षांत मासे खाण्याचे प्रमाण वाढले असून माशांचा हा खप जागतिक अंदाजापेक्षा कमी असला तरी 2031 पर्यंत तो त्या स्तरावर पोहोचण्याची शक्यता आहे. गेल्या पाच वर्षांत 28 टक्के कुटुंबांनी मासे खाण्यात वाढ केल्याचे एका अहवालात समोर आले आहे.

राष्ट्रीय आर्थिक संशोधन परिषदेने केलेल्या एका सर्वेक्षणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आर्थिक संशोधन परिषदेने भारत सरकारच्या मत्स्य व्यवसाय विभागासाठी या क्षेत्राचा व्यापक अभ्यास केला. 2022-23 मध्ये प्रत्येक कुटुंबात मासे खाण्याच्या प्रमाणात पाच किलोपर्यंत वाढ झाली आहे. 2011-12 मध्ये प्रत्येक कुटुंबात मासे खाण्याचे प्रमाण 7 किलो प्रतिवर्ष होते. ते आता 13 किलो प्रतिवर्ष झाले आहे. देशाच्या 24 राज्यांमध्ये आणि 105 जिल्ह्यांमध्ये जवळपास 13 हजार कुटुंबांचा समावेश करत हा अभ्यास करण्यात आला.
यात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे गेल्या पाच वर्षांत 28 टक्के कुटुंबांनी मासे खाण्यात वाढ केली आहे; तर विविध प्रकारचे मासे उपलब्ध असल्यास त्यांचा खप वाढतो, असे 56 टक्के कुटुंबांचे मत आहे.

लोक मासे खाणे का टाळतात?

कमी उत्पन्न गटातील लोक जेवणात माशांचा वापर मुळातच कमी करतात तर मध्यम उत्पन्न गटातील लोक माशांमुळे आरोग्याच्या फायद्यांबद्दल जागरूक नाहीत. उच्च उत्पन्न गटातील अनेक लोक माशांच्या ताजेपणाच्या अभावामुळे किंवा स्वच्छतेच्या अभावामुळे मासळी बाजारात जाण्याचे टाळतात.

Back to top button